मीरा-भाईंदरचे आयुक्त दिलीप ढोले यांनी ‘धम्म सम्राट अशोक बुद्ध विहारा’च्या उद्घाटनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मला निमंत्रित करूनदेखील महापौरांनी अधिकारांचा गैरवापर करत स्वत:च्या मर्जीतील दोघा निमंत्रितांंची नावे प्रमुख पाहुण्यांच्या यादीत टाकली. हा राजशिष्टाचाराचा भंग आहे. या वास्तूचे उद्घाटन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे किंवा शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांच्या हस्ते झाले असते, तरी माझी काहीही हरकत नव्हती, परंतु त्यासाठी राजशिष्टाचाराचा भंग करण्याची आवश्यकता नव्हती, असे खडेबोल विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मिरा-भाईंदरच्या महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांना सुनावले.
मीरा-भाईंदर महापालिकेत सत्ताधारी पक्ष भाजप असल्याने फडणवीस यांच्या हस्ते बुद्ध विहाराचे उद्घाटन करण्यासाठी त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. तर बुद्ध विहाराचे लोकार्पण असल्याने केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनाही निमंत्रित करण्यात आले होते. मिरा भाईंदर शहरातील सर्वात वादग्रस्त म्हणून ज्यांची ओळख आहे, असे भाजपचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांचे लाड पुरविण्यासाठी महापौर ज्योत्स्ना हसनाळे यांनी राजशिष्टाचाराला खो दिला आहे. त्यांनी स्वतःच्या कार्यालयातून कार्यक्रम पत्रिका प्रसिद्ध करत राजशिष्टाचारानुसार केंद्रीय मंत्र्यांनाही डावलून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव सर्वात वर लिहिले आहे. यामुळे भाजप सत्ताधारी महापौर यांनीच केंद्रीय मंत्र्यांचा हक्कभंग केला असल्याचे त्या कार्यक्रम पत्रिकेतून दिसून येते.
शासन परिपत्रक, महासभा ठराव, पालिका परिपत्रकांचे उल्लंघन करून कार्यक्रम पत्रिका छापणे हे चुकीचे असतानाही मेहतांसाठी हा अट्टाहास चालू असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.जिल्ह्यात केंद्रीय मंत्री, मंत्री, राज्यमंत्री, लोकसभा सदस्य, खासदार, विधानसभा सदस्य, विधान परिषद सदस्य, महापौर व स्थानिक नगरसेवक यांना डावलून एखाद्या कामाचे भूमिपूजन, लोकार्पण, उद्घाटन करणे हे चुकीचे असतानाही मेहता सध्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य नसताना त्यांचे नाव कार्यक्रम पत्रिकेत छापले आहे. त्यामुळे सत्ताधारी भाजपने महापालिका नरेंद्र मेहता यांच्या दावणीला बांधण्याचे काम करत असल्याचे दिसून येत आहे. तर त्याच कार्यक्रम पत्रिकेत वरच्या विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांचेही नाव खाली टाकण्यात आले आहे.