राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांचा आकडा हा वाढत असल्याने सर्वत्र चिंतेचं वातावरण आहे. महाराष्ट्रात भारतातील सर्वाधिक कोरोना रुग्ण आढळले असून एकूण रुग्णांची संख्या ८ लाख ८ हजार ३०६ वर पोहोचली आहे. अशा परिस्थितीत मुंबईतील कोरोना चाचण्या वाढवा, असा आग्रह करत असताना सुद्धा मुंबईत जुलैच्या तुलनेत ऑगस्टमध्ये केवळ १४ टक्केच अधिक चाचण्या करण्यात आल्या. तर हीच संख्या राज्याच्या बाबतीत ४२ टक्के असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे मुंबईत तातडीने कोरोना चाचण्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
मुंबईत चाचण्या वाढविण्याची नितांत गरज, पश्चिम महाराष्ट्राच्या दौर्यात आढळलेली निरीक्षणे, त्यासंदर्भात करावयाच्या उपाययोजना यासंदर्भात मुख्यमंत्री मा. उद्धव ठाकरेजी यांना पत्र… pic.twitter.com/gKiG2ukwNy
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2020
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईत जुलै महिन्यात प्रतिदिन चाचण्यांची संख्या ६५७४ होती, ती ७७०९ वर गेली. ही वाढ केवळ १४ टक्के आहे. राज्यात प्रतिदिन चाचण्या जुलैत ३७ हजार ५२८ इतक्या झाल्या आहेत, ती संख्या वाढून ऑगस्टमध्ये प्रतिदिन ६४ हजार ८०१ इतकी झाली. ही वाढ ४२ टक्के आहे. ऑगस्टमधील कोरोनाचा संसर्ग दर महाराष्ट्रात १८.४४ टक्के इतका होता. तो राष्ट्रीय सरासरीपेक्षा मोठ्या प्रमाणात असल्याचे सांगण्यात येत आहे.
काही दिवसांपूर्वी झालेल्या उत्तर महाराष्ट्राच्या दौर्यासंदर्भात सुद्धा काही सूचना त्यांनी या पत्रातून केल्या असून, महात्मा जनारोग्य योजनेची प्रकरणे त्वरित निकाली काढणे, सातार्यात खाटांची क्षमता अधिक वाढवणे, सांगली आणि कोल्हापूर येथील संसर्ग दर, मृत्यूदर नियंत्रणात आणणे, रेमडेसिवीर हे औषध सर्वांना मोफत उपलब्ध करुन देणे, अशा सूचना देखील यात करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, देशात सरासरीपेक्षा अधिक प्रतिदिन प्रतिदशलक्ष चाचण्या करणार्या राज्यांमध्ये भारताच्या सरासरी पेक्षाही महाराष्ट्र मागे आहे तर देशात गेल्या २४ तासांत १० लाख १२ हजार ३६७ जणांनी कोरोना चाचणी केली तर आतापर्यंत देशात ४ कोटी ४३ लाख ३७ हजार २०१ चाचण्या घेण्यात आल्याची माहिती ICMR ने दिली आहे.