बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस राहिले असल्याने सर्वत्रच जय्यत तयारी सुरू झाली आहे. त्यामुळे ढोल पथकाच्या सरावाला जोर आला आहे. मात्र राज्यावर आलेल्या अस्मानी संकटाचे सावट सणांवर आहे. पूरग्रस्तांच्या मदतीला सर्वचजण धावून गेले असतानाच, आता कल्याणातील शिवमुद्रा प्रतिष्ठानने गणेशोत्सवातून ढोल पथकाला मिळणारी मानधनाची रक्कम पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
मानधनाची रक्कम पूरग्रस्तांना मदत
गणपती बाप्पाच्या स्वागताची सर्वत्र जल्लोषात तयारी सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या काळात पारंपारिक ढोलताशांवर थिरकण्यासाठी व गणेशोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी सध्या ढोल पथक सज्ज झाले आहेत. कल्याणमधील ढोलताशा पथकेही सज्ज झाली असून, त्यांचा सराव एपीएमसीच्या मैदानावर जोरात सुरू आहे. त्यामुळे ढोलताशांचा आवाज घुमू लागला आहे. ‘बाप्पा मोरया’च्या गजरात उत्साहाचा सूर टिपेला पोहोचला आहे. मात्र या कलाकारांनी आपल्याला मिळालेल्या मानधनाचा काही भाग कोल्हापूर, सांगलीतील पूरग्रस्तांना देण्याचा निर्णय घेऊन सामाजिक जाणिवेचा वसा देखील जपणार आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून ढोल पथक तयारी करीत आहेत. नोकरी व्यवसाय संभाळून अनेकजण ढोल पथकात आहेत. त्यामुळे दर रविवारी १२ ते ६ वाजेपर्यंत सराव सुरू असतो. गणेशाचे आगमन आणि विसर्जन यावर नवीन रिदम तयार केले आहेत. मात्र यंदा ढोल पथकाला मिळणारी मानधनाच्या रकमेतून पूरग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक वस्तू खरेदी करून देणार आहोत, अशी माहिती ढोल पथक सराव प्रमुख सौरव मंचेकर यांनी सांगितले.