अत्यावश्यक सेवांच्या कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सुरु करण्यात आल्याने या प्रवासासाठी ‘क्यूआर कोड’ आधारित ‘ई -पास’ सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या या प्रकारच्या प्रणालीवर ती आधारलेली असेल. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये ही प्रणाली उपलब्ध होईल. मात्र तोपर्यंत संबंधितांचे ओळखपत्र ग्राह्य मानून तूर्त प्रवास करता येईल. ई पास सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती माहिती भरुन पास तयार करुन घ्यावेत. कार्यालयांच्या व कामांच्या वेळा सुनिश्चित असल्याने रेल्वेने त्यानुसार वेळापत्रक तयार केले असून त्याची माहिती कर्मचाऱ्यांना करुन द्यावी, अशा सूचना महापालिका अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध महापालिका आयुक्तांसह पोलिस व मोठ्या खासगी रुग्णलयातील प्रशासकांना केल्या.
केंद्र सरकारने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे सेवा सोमवार पासून उपलब्ध करून दिली आहे. त्याअनुषंगाने मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी विविध महानगरपालिकांच्या आयुक्तांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक घेतली. मुंबई महानगरपालिकेचे बहुतांश अधिकारी-कर्मचारी हे संपूर्ण मुंबई प्रदेशातील इतर महानगरपालिकांच्या हद्दीत वास्तव्यास असून त्यादृष्टीने त्यांच्या प्रवासामध्ये सुलभता असावी, यासाठीदेखील या बैठकीत चर्चा करण्यात आली. यावेळी झालेल्या चर्चेत जयस्वाल यांनी, सर्व महानगरपालिकांनी आपापल्या आरोग्य क्षेत्रातील कर्मचाऱ्यांसह अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना उपनगरीय रेल्वेने प्रवास करता यावा, यासाठी सुनियोजित पद्धतीने कार्यवाही करावी. मंत्रालय, मुंबई महानगरपालिकेसह इतर सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांचे कर्मचारी, पोलीस, बेस्ट तसेच खासगी रुग्णालयांचे कर्मचारी व कंत्राटी तत्वावर कार्यरत आरोग्य कर्मचारी यांनाही या प्रवासाची मुभा असेल, अशी माहिती दिली.
या प्रवासासाठी ‘क्यूआर कोड’ आधारित ‘ई -पास’ सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. मुंबई पोलिसांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या याप्रकारच्या प्रणालीवर ती आधारलेली असेल, असे सांगितले. येत्या ३ ते ४ दिवसांमध्ये ही प्रणाली उपलब्ध होईल. तोपर्यंत संबंधितांचे ओळखपत्र ग्राह्य मानून तूर्त प्रवास करता येईल. ई पास सुविधा उपलब्ध झाल्यानंतर सर्व संबंधित यंत्रणांनी आवश्यक ती माहिती भरुन पास तयार करुन घ्यावेत. कार्यालयांच्या व कामांच्या वेळा सुनिश्चित असल्याने रेल्वेने त्यानुसार वेळापत्रक तयार केले असून त्याची माहिती कर्मचाऱयांना करुन द्यावी. सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या हद्दीमध्ये स्थानकांवर थर्मल स्क्रिनिंगची व्यवस्था करावी. शक्यतोवर त्यासाठी थर्मल कॅमेऱयांचा उपयोग करावा. तसेच रेल्वे स्थानकांच्या १५० मीटर परिघात फेरीवाले किंवा वाहनतळ यांना परवानगी दिली जाणार नाही, याची दक्षता संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व पोलीस यांनी आपसात समन्वय राखून घ्यायची आहे. तसेच नियोजित सर्व स्थानकांवर पुरेशा कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका उपलब्ध राहतील, याची तरतूद करावी. बेस्ट आणि एसटी महामंडळ यांनी वाहतुकीच्या दृष्टिकोनातून पुरेशा बसेस उपलब्ध करुन द्याव्यात, अशी सूचनाही जयस्वाल यांनी केली.प्रत्येक स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपापल्या कर्मचाऱ्यांची आवश्यक ती आरोग्यविषयक काळजी घेण्यासंदर्भात सर्वतोपरी प्रयत्न करावे, असेही जयस्वाल यांनी अखेरीस नमूद केले.
या बैठकीला नवी मुंबईचे आयुक्त अण्णासाहेब मिसाळ, मिरा-भाईंदरचे आयुक्त चंद्रकांत डांगे, उल्हासनगरचे आयुक्त समीर उन्हाळे, वसई-विरारचे आयुक्त. डी. गंगाधरन, पनवेलचे आयुक्त सुधाकर देशमुख, कल्याण-डोंबिवलीचे आयुक्त विजय सूर्यवंशी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तांसह पोलिस व खासगी मोठ्या रुग्णालयांचे प्रशासक आदी मान्यवर या बैठकीमध्ये सहभागी झाले होते.
हेही वाचा –
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी १२९ कोटी रुपयांचा निधी वितरित