दारूचे व्यसन वाईट असल्याचे सांगितल्या जाते. मात्र वयाने मोठे झाले की काही तरुण दारू पिण्यास सुरुवात करातात. सुरुवातीला मजा म्हणून पिली जाणारी दारू नंतर व्यसन बनते. दारूमुळे अनेकांचे बळी गेले असल्याच्या घटना आपल्या समोर येतच असतात. मात्र दारू पिण्यासाठी मित्राने पैसे न दिल्याचा राग मनात ठेवून मित्राला खाडीत फेकून दिल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंडी परिसरात ही घटना घडली आहे. दारू पिल्यानंतर मानसाची बुद्धी भ्रष्ट होते याचे हे एक जिंवत उदाहरण असल्याचे दिसत आहे.
कसा घडला प्रकार
राजू गायकवाड असे त्या मृत तरुणाचे नाव असून या हत्येत अविनाश उर्फ टप्पू ढिलपे (२६), कृष्णा उर्फ चाम्या सुतार (१९) आणि एका अल्पवयीन आरोपीचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मागील अनेक महिन्यांपासून या चौघात मैत्री होती. ही मैत्री फक्त दारू पिण्यास बसण्यासाठी असल्याचे परिसरातील लोकांनी सांगितले जाते आहे.
खाडीत दिले ढकलून
गोवंडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका बारमध्ये मयत राजू त्याच्या ३ मित्रांसोबत दारू पिण्यास बसला होता. या दरम्यान दारू पिण्याचे पैसे संपल्यावर मित्रांनी आणखी दारू पिण्यासाठी राजूजवळ पैशांची मागणी केली. मात्र, राजूजवळचे सुद्धा पैसे संपले होते. तेव्हा तुझ्या अंगावरील दागिने देऊन दारू पाज, अशी मागणी मित्रांनी केली. राजूने या मागणीला नकार दिल्यानंतर राजू आणि त्याच्या मित्रांमध्ये झटापट झाली. या झटापटीत राजूच्या कानातील बाळी पडली त्यामुळे पोलिसात तक्रार देण्याची धमकी त्याने आपल्या मित्रांना दिली. घाबरलेल्या मित्रांनी राजूची समजूत काढत त्याला गाडीवर बसवले आणि जुन्या वाशी पुलावर नेऊन खाडीत ढकलून दिले व घटनास्थळावरून पळ काढला.