ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने रविवारी डोंबिवलीत मानवी साखळी द्वारे ‘चला प्लास्टिकमुक्त हिरवाईकडे’ हा संदेश जनमानसात रुजविण्याचा प्रयत्न केला. कोणतीही घोषणा न देता फाउंडेशनच्या महिलांनी मानवी साखळी द्वारे चालत हा संदेश दिला. राज्य सरकारची ५० मायक्रोन खालील प्लास्टिकच्या पिशव्यांना बंदी असूनही भाज्या, फुले, फळे, तसेच इतर सामान घेणारे लोक पिशव्या मागतात आणि त्यांना भाजीवाले, फुलवाले , फळवाले नाइलाजास्तव प्लास्टिक पिशव्या देतात. त्यामुळे ऊर्जा फाउंडेशनच्या वतीने पुढाकार घेऊन ‘चला प्लास्टिकमुक्त हिरवाईकडे’ हा संदेश दिला. यावेळी जेष्ठ नागरिक, काँलेज विद्यार्थी- विद्यार्थिनी, शाळेतील बच्चेकंपनी, अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या स्त्रिया ,पुरूष वर्ग उपक्रमात सहभागी झाले होते.
प्लास्टिक मुक्त उपक्रमाला उदंड प्रतिसाद
डोंबिवली पूर्वेतील बाजी प्रभू चौक, येथुन मानवी साखळीला सुरुवात झाली. भाजी मार्केटमधील भाजीवाल्यांनीही उदंड प्रतिसाद दिला. खरतर भाजीवाल्यांना प्लास्टिक पिशव्या द्यायच्या नसतात. मात्र, लोक भाजी घेणार नाहीत, या भीतीने पिशव्या भाजीवाले ठेवतात. ऊर्जा फाउंडेशनच्या प्लास्टिक कलेक्शनला ही डोंबिवलीकर नेहमीच भरभरून प्रतिसाद देत आले आहेत. याचा प्रत्यय आजही आला. ऊर्जा फाउंडेशनच्या मानवी साखळीत नागरिकांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा. याकरता घोषवाक्य छापलेले अॅप्रन बनवून सर्वांना घालण्यास देण्यात आले तसेच ‘चला आपली सवय बदलूया कापडी पिशवी वापरूया’ किंवा ‘ Do some drastic say no to plastic’ अशी घोषवाक्य असलेले फलक नागरिकांना देण्यात आले. काही कापडी पिशव्या नागरिकांना दिल्या, प्लास्टिक पिशव्या वापरू नका हि विनंती करून बाजीप्रभू चौकापासून, भाजी गल्ली आणि फडकेरोड येथील बसणारे भाजीवाले, फळवाले, तसेच दुतर्फा असलेल्या दुकानदारांनीही खूप चांगला प्रतिसाद दिला.