महाराष्ट्राचे नवे गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेत झालेल्या आढावा बैठकीत मुंबईत म्हाडाची परवडणारी घरं अशक्य असल्याचे घोषित करण्यात आले होते. विखे पाटील यांच्या पाठोपाठच आता म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी गिरणी कामगारांव्यतिरिक्त कुणालाच मुंबईत घरे मिळणार नसल्याचे जाहीर केले आहे. मुंबई वगळता राज्यभरातील विविध मंडळांतर्गत १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार असल्याचेही उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
म्हाडाच्या माध्यमातून पुणे, औरंगाबाद, नाशिक, कोकण, नागपूर, अमरावती व गिरणी कामगारांसाठी अशा एकूण १४ हजार ६२१ घरांची सोडत काढण्यात येणार आहे. या सोडतीत अल्प, अत्यल्प, मध्यम, उच्च गटासाठी किती घरे राखीव असणार याबाबत अजूनही स्पष्टता नसली तरीही गिरणी कामगारांसाठी मुंबईत घरे उपलबध करण्यात येणार असल्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वीच गिरणी कामगारांसाठी अलिबाग, उरण येथे घरे उपलब्ध होतील या विधानामुळे विखे पाटील यांना गिरणी कामगारांच्या टिकेला सामोरे जावे लागले होते. सर्व स्तरातून विरोध झाल्यानंतर अखेर गिरणी कामगारांना मुंबईत घरे मिळण्याची तरतूद करण्यात आली आहे. ५०० चौ पूटापेक्षा कमी क्षेत्रफळांच्या घरांचे सेवाशुल्क रद्द करण्याला पालिकेने हिरवा कंदिल दाखविला आहे. हा नियम म्हाडा घरांना लागू होणार असून येत्या १५ दिवसात त्यांनी अंमलबजावणीला सुरूवात करण्यात येणार असल्याचे सामंत यांनी यावेळेस स्पष्ट केले.
कुठे किती घरे
विभाग घरे
पुणे मंडळ २००० घरे
नाशिक मंडळ ९२ घरे
औरंगाबाद मंडळ १४८ घरे
अमरावती मंडळ १२०० घरे
नागपूर मंडळ ८९१ घरे
कोकण मंडळ ५३०० घरे
गिरणी कामगार ५०९० घरे
एकूण १४ हजार ६२१ घरे