नाशिक : आपल्या देशात भाषेवरून नेहमीच राजकारण होत आल आहे. त्यातूनच उर्दू ही मुसलमान लोकांची भाषा असल्याचा समज पसरला. हा समज चुकीचा असून, ही भाषा सुंदर आहे. यात कमी शब्दात मोठा आशय सांगितला आहे, असे मत साहित्यिक व विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांनी व्यक्त केले.
उर्दू भाषेचे अभ्यासक डॉ. रवींद्र शिवदे यांनी लिहिलेल्या ‘गौतम बुद्ध के अक्वाल -ए- जरीन’ या पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. साहित्यिक उत्तम कांबळे म्हणाले की, बुद्ध हे पहिले विचारवंत असून, त्यांनी मनाचा विचार केला. दुःख कुठे सुरू होत याचा शोध बुध्दांनी घेतला. उर्दू भाषा खूप सुंदर आहे. ती कुठल्याही कंगाल माणसाला श्रीमंत व समृद्ध करते. डॉ. शिवदे म्हणाले की, या पुस्तकाच्या माध्यमातून उर्दू वाचकांना धम्मपदे वाचण्यासाठी उपलब्ध झाली आहेत.
बुद्धांचे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे. प्रकाशकांकडून लवकरच पाकिस्तानमध्ये या पुस्तकाची छपाई होईल. यावेळी साहित्यिक प्रा. डॉ. दिलीप धोंडगे, उर्दू अभ्यासक अश्फाक अहमद खलिफा आणि उर्दू अभ्यासक जनाब इलियास लाल बेग मिर्झा, डॉ. धनंजय चव्हाण,डॉ. मनीषा जगताप, डॉ. अनुजा शिवदे, डॉ. पूनम शिवदे, डॉ. निवेदिता पवार, रजनी खानदेशी उपस्थित होते.