”भाजप सरकारने मेट्रोचे खाजगीकरण न करता हे काम अनिल अंबानींच्या रिलायन्सला न दिल्यामुळे तर कॉंग्रेस आज थयथयाट तर करीत नाही ना?”, असा थेट सवाल भाजप अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. मुंबई मेट्रोची कामे फक्त कागदावर करणाऱ्या कॉंग्रेसने एलिव्हेटेड मेट्रो करण्याचा निर्णयही घेतला. मात्र, आपल्या जुन्या पध्दतीप्रमाणे कंत्राटदारांना सेटलमेंटसाठी तर कॉंग्रेस धमकावत नाही ना? असा सवाल उपस्थित करत आशिष शेलार यांनी संजय निरूपम यांना चोख प्रतिउत्तर दिले आहे. आशिष शेलार म्हणाले की, ‘उपनगरीय रेल्वेला सक्षम पर्याय कॉंग्रेसने निर्माण न केल्यामुळेच आज प्रचंड ताण या रेल्वेवर असून त्याचे परिणाम मुंबईकरांना भोगावे लागत आहेत. तरीही आपल्या चांगल्या भविष्यासाठी आज होणारी अडचण ते सहन करीत आहेत. मात्र, निवडणुका जवळ आल्यामुळे भुलभुलैया फेम संजय निरूपम राजकारण करण्यासाठी पत्रकारपरिषदा घेत आहेत’, अशा शब्दात आशिष शेलार यांनी प्रसिद्धी पत्रकामध्ये त्यांचा समाचार घेतला आहे.
रिलायन्सला काम न दिल्यामुळे काँग्रेसचा थयथयाट?
कॉंग्रेस सरकारने तत्कालिन राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते भूमिपुजन केल्यानंतर ही मेट्रोचे काम सुरू केली नाहीत. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमएमआरडीने अनेक अडचणींवर मात करत सुरूवातीपासूनच कामाला वेग दिला आहे, असेही शेलार यांनी म्हटले आहे. शेलार म्हणाले, ‘१४ नोव्हेंबर २००६ ला कॉंग्रेस सरकारने मुंबई मेट्रोचे खाजगीकरण करून अनिल अंबानींच्या रिलायन्सला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो बदलून भाजप सरकारने ही मेट्रो घाटकोपर मेट्रोप्रमाणे रिलायन्सला न देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तर कॉंग्रेस थयथयाट करीत नाही ना?’, असा अप्रत्यक्ष आरोप आशिष शेलार यांनी केला आहे.
‘मुंबई मेट्रोच्या मास्टर प्लॅनला सन २००४ ला मंजूरी देण्यात आली. त्यावेळी तत्कालीन कॉंग्रेसच्या सरकारने एलिव्हेटेड रेल्वेला मंजूरी का दिली? तसंच मेट्रोचा फायनल मास्टर प्लॅन २८ मे २००४ ला तयार झाला. त्यालाही तात्कालिन कॉंग्रेस सरकारने मंजूरी दिली. इतकंच नाही तर तात्कालिन कॉंग्रेस मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या एमएमआरडीएच्या ११४ व्या मिटींमध्ये मंजूर झाला. मग मुख्यमंत्र्यांना भेटल्यानंतर कॉंग्रेसने आपला प्लॅन का बदलला नाही? किंवा त्यावर फेरविचार का केला नाही? असे प्रश्न उपस्थित आशिष शेलार यांनी उपस्थित करत, संजय निरूपम यांचेच पितळ उघडे पाडले आहे.