आगामी लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान राहणार नाहीत, असे भाकीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी वर्तविले आहे. ते म्हणाले की, या निवडणुकीत भाजप सिंगल लार्जेस्ट पार्टी कदाचित बनेल. मात्र, बहुमताचा आकडा त्यांना पार करता येणार नाही. त्यामुळे सरकार स्थापनेसाठी त्यांना आघाडी करावी लागेल. मात्र मोदींना इतर पक्ष स्विकारणार नाहीत, त्यामुळे मोदी पंतप्रधान होणे अवघड आहे. आज यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमानंतर पवारांनी पत्रकार परिषद घेऊन हे भाकीत केले. तसेच ते म्हणाले की, एअर स्ट्राईकमध्ये आम्ही राजकारण आणू इच्छित नाही. मात्र ज्यांना निवडून येता येणार नाही, असे लोक याचे राजकारण करत आहे.
मुख्यमंत्र्यांचे वक्तव्य बालिशपणाचे
मी माझ्या ५२ वर्षाच्या संसदिय कारकिर्दीत १४ निवडणुका जिंकल्या आहेत. मी माढाचा निर्णय दिल्यानंतर काही लोकांनी बालिशपणाचे वक्तव्य केले आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी हे कधी ना कधी निवडणुकीत हरले आहेत. पण, मी कधीही हरलो नाही. त्यामुळे भाजपच्या नेत्यांनी माझ्याबद्दल असे वक्तव्य करताना जरा विचार करायला हवा, असा टोला शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.