देशाची निवडणूक असो किंवा राज्याची, राजकीय पटलावर ठाणे नेहमीच केंद्रस्थानी राहिले आहे. त्यामुळे ठाणे जिल्हयाकडे सर्वच राजकीय नेत्यांच्या नजरा लागलेल्या असतात. विधानसभा निवडणूका तोंडावर आल्याने फोडा फोडीच्या राजकारणाला ऊत आला आहे. सध्या भाजपात जोरदार इनकमिंग सुरू आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांनी बुधवारी अधिकृतपणे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता गणेश नाईकसांहेबांनी आशिर्वाद द्यावा हे मुख्यमंत्रयाचे वक्तव्य बोलके आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीचे मातब्बर नेते गणेश नाईक यांच्या प्रवेशाची औपचारीकता उरली आहे. शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना हे समीकरण गेल्या अनेक वर्षापासून आहे. शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे आणि त्यानंतर ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यावर वर्चस्व कायम ठेवले आहे. त्यामुळे शिंदे यांच्या वर्चस्वाला सुरूंग लावण्यासाठी भाजपचे गणेशास्त्र असणार आहे. ठाणे जिल्हयात भाजपला गणेश नाईकांच्या रूपाने मोठा नेता मिळणार असल्याने, शिवसेनेला हे अडचणीचे ठरणार आहे.
ठाण्यात सेनेला कमकूवत करण्यासाठी भाजपचा डाव
ठाण्याचा राजकीय इतिहास पाहिल्यास ठाणे शहर आणि जिल्ह्यात शिवसेनेची पकड आहे. १९६७ साली शिवसेनेने स्वबळावर ठाणे महापालिकेची निवडणूक लढवून जिंकूनही दाखवली तेव्हापासून ते आजतागायत शिवसेना आणि ठाणेकरांचे ऋणानुबंध आहेत. आनंद दिघे यांनी जिल्ह्यात पक्षाचे चांगले बस्तान बसवले. पण त्यांच्या आकस्मिक निधनानंतर सेनेची जिल्ह्यातील घडी पूर्णपणे विस्कटून गेली. दिघे यांच्या पश्चात आमदार एकनाथ शिंदे यांच्याकडे पक्ष नेतृत्वाची जबाबदारी सोपविण्यात आली. ती जबाबदारी शिंदे यांनी यशस्वीपणे सांभाळली. सध्या ठाणे जिल्ह्यावर शिंदे यांची पकड आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण, डोंबिवली या दोन महापालिका, अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका या शिवसेनेच्या ताब्यात आहेत. उल्हासनगर आणि मीरा भाईंदर महापालिकेत भाजपचे वर्चस्व आहे. भिवंडी महापालिकेत कॉंग्रेसची सत्ता असून शिवसेनेचा उपमहापौर आहे. ठाणे जिल्हा परिषदेवरही शिवसेनेची सत्ता आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपपेक्षा शिवसेनेची ताकद अधिक आहे. तसेच जिल्ह्यात एकूण १८ आमदार आहेत. त्यापैकी भाजपचे ७, शिवसेनेचे ६ तर राष्ट्रवादी काँग्रेसचे ४ आमदार तर अपक्ष १ आहे. त्यातील एरोलीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे संदीप नाईक यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि ज्योती कलानी हे दोनच आमदार राहिले आहेत. ठाणे जिल्ह्यातील शिवसेनेचे प्राबल्य मोडून काढण्यासाठी भाजपने पद्धतशीरपणे प्रयत्न सुरू केले आहेत. यापूर्वीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कल्याण दौऱ्याच्या निमित्ताने भाजपने हे अधोरेखित केले होते. आता गणेश नाईकांना पक्षात प्रवेश देऊन सेनेची ताकद खिळखिळी करण्याचाही भाजपचा डाव लपून राहिलेला नाही.
शिवसेनेला शह देण्यासाठी नाईक मैदानात
लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान पालकमंत्री एकनाथ शिंदे विरूध्द गणेश नाईकांचा सामना रंगलेला पाहावयास मिळाला. लोकसभा निवडणुकीत पराभव दिसल्याने अनेकजण मैदान सोडून पळून गेले. त्यामुळे अनेकांना जबरदस्तीने धरून बांधून बोहल्यावर चढविले आहे, अशी टीका शिंदे यांनी नाईकांवर केली हेाती. त्यामुळे नाईकी संतप्त झाले होते. मी कोणाच्या वादात- प्रवादात पडत नाही. पण माझया नादाला लागलात तर पाठीची सालटी सोलेन असा गंभीर इशाराही नाईक यांनी शिंदे यांना दिला होता. ठाणे जिल्ह्यात शिंदे यांना शह देईल असा नेता सध्या भाजपकडे नाही. त्यामुळे नाईकांना भाजपमध्ये ओढून मुख्यमंत्रयांनी शिंदे आणि शिवसेना देाघांनाही शह देण्याची खेळी खेळली आहे. नवी मुंबईतील अतिक्रमित बावखळेश्वर मंदिरावर हातोडा पाडण्यात आला. त्यात शिवसेनेचा हात असल्याचा गंभीर आरोपही नाईक यांनी केला होता. त्यामुळे भविष्यात शिवसेनेला शह देण्यासाठी नाईक मैदानात उतरणार हे निश्चितच आहे.
हेही वाचा – मुख्यमंत्री आणि आदित्यच्या यात्रेला राष्ट्रवादीकडून ‘शिवस्वराज्य यात्रे’चे उत्तर