आक्रमकपणे विरोधकांवर टीका करणारे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी पक्षांवर निशाणा साधला आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे मुंबईची परिस्थिती बिकट झाली असून याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे. ‘भाजप आणि शिवसेनाच्या खात्यातून नालेसफाईचे पैसे सुटत नसल्यामुळे मुंबई पाण्यात जाते’, असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगरपालिकेच्या कामकाजावर ताशेरे झाडले आहे. मे महिन्यांपर्यंत नालेसफाईच्या आधीच कामाचं टेंडर काढून हे काम संपवणं अपेक्षित असतं. पण हे काम मे महिन्याच्या शेवटी सुरू करुन ते जूनच्या सुरूवातीला अर्धवट संपवलं जातं. असा आरोप देखील आव्हाड यांनी केला आहे.
सोमवारी पावसाने जोर वाढवलेला दिसतं असून यामुळे मुंबईकर हैराण झाले आहेत. रेल्वे ट्रॅक आणि सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. मुंबईच्या दादर, सायन, माटुंगा आणि कुर्ला या भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून या भागातील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीच्या दृष्टीकोनातून जितेंद्र आव्हाड यांनी मुंबई महानगरपालिकेवर टीका केली आहे.
सायन, माटुंगा भागात रेल्वे ट्रॅकवर पाणी साचल्यामुळे मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. सकाळी कार्यलयात जाणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप झाला आहे. तसेच हिंदमाता परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. यामुळे आव्हाडांनी सत्ताधारी यांच्या निशाणा साधला आहे, अशी एका मराठी वृत्तवाहिनीने यासंदर्भातील बातमी दिली आहे.