मुंबई : एचडीएफसी बँकेचे उपाध्यक्ष सिद्धार्थ संघवी यांचा खूनामागील गूढ आणखी वाढले आहे. अटक करण्यात आलेला आरोपी शिताफीने दिशाभूल करत आहे. सध्या तरी त्याने ३५ हजार रुपयांसाठी त्याने खून केल्याचे कबूल केले असले, तरी खरे कारण नेमके काय आहे, हे जाणून घेण्यासाठी आरोपी सरफराज शेखची चौकशी करण्यासाठी भायकळा पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक दिनेश कदम आणि वरळी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुखलाल वर्पे यांना नियुक्त केले जाण्याची शक्यता आहे. या दोन अधिकार्यांनी १९९३ च्या बाँब ब्लास्ट प्रकरणात आणि शीना बोरा हत्याकांड प्रकरणात महत्वपूर्ण भूमिका बजावली होती.
सहआयुक्त देवेन भारती आणि मध्य विभागाचे अतिरीक्त आयुक्त रविंद्र शिसवे यांनी हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. ५ सप्टेंबर रोजी सिद्धार्थ संघवी बँकेतून घरी जाण्यासाठी बाहेर पडले, मात्र पार्कींगमध्ये असणार्या त्यांच्या गाडीजवळ सरफराज शेख याने त्यांच्यावर चाकुचे १८ वार करत खून केला होता.९ सप्टेंबर रोजी नवी मुंबई पोलिसांनी सरफराज शेख याला अटक केली आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार कल्याणच्या हाजी मलंग येथून संघवी यांचा मृतदेह पोलिसांना सापडला. आरोपीने कोर्टात दिलेल्या कबुलीप्रमाणे गाडीचा ईएमआय आणि कर्ज फेडण्याच्या पैशासाठी हा खून केला असल्याचे सांगितले होते. पण त्याने दिलेल्या कबुलीवर पोलीस समाधानी नसल्याचे दिसत आहेत. म्हणूनच तपासाची नवी दिशा म्हणून कदम आणि वर्पे यांच्याकडे हे प्रकरण जाण्याची शक्यता आहे.
खूनामागे वेगवेगळे संशय
संघवी यांच्या खुनानंतर पोलिसांनी सर्व बाजुंनी तपासाला सुरुवात केली होती. यामध्ये कामाच्या ठिकाणी त्यांना लवकर बढती मिळाल्यामुळे ईर्षेतून हा खून केला गेला आहे का, याचाही तपास करण्यात आला होता. दुसरे म्हणजे संघवी यांचे अनैतिक संबंध होते का, ज्यामुळे त्यांच्या पत्नीने त्यांना संपवले या बाजुनेसुद्धा पोलीस तपास करत होते. मात्र आरोपी सरफराज शेख याने कबुली दिल्यानुसार त्याने केवळ पैशासाठी खून केला असल्याचे सांगितले. खुनाच्या १५ दिवसानंतर आता या प्रकरणाची पुन्हा चर्चा होताना दिसत आहे.