घरमुंबईसमीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? सीबीआयने मुंबई हायकोर्टात अंतरिम संरक्षण मागे घेण्याची केली...

समीर वानखेडेंच्या अडचणी वाढणार? सीबीआयने मुंबई हायकोर्टात अंतरिम संरक्षण मागे घेण्याची केली मागणी

Subscribe

मुंबई : अभिनेता शाहरुख खान यांचा मुलगा आर्यन खानला अटक केल्यानंतर समीर वानखेडे यांनी लाचखोरी व खंडणीखोरी केली असल्याच्या आरोपांबाबत प्रथमदर्शनी पुरावे असल्यामुळे त्यांना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून दिलेले अंतरिम संरक्षण मागे घ्यावे’, अशी मागणी सीबीआयने बुधवारी (7 जून) मुंबई उच्च न्यायालयाला केली.  त्यामुळे समीर वानखेडेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Sameer Wankhede’s problems will increase? The CBI has requested the Bombay High Court to withdraw the interim protection)

क्रुझ ड्रग्सप्रकरणी आर्यन खानला गेल्या वर्षी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) तत्कालीन प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांनी अटक केली होती. त्यानंतर आर्यनच्या सुटकेसाठी वानखेडे यांनी शाहरुखकडे 25 कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी केली, अशा आरोपाखाली सीबीआयने एफआयआरची नोंद केली आहे. परंतु सीबीआयने दाखल केलेला एफआयआर खोटा असून आपल्याला अडकवण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचा आरोप वानखेडे यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत केला. वानखेडेंची बाजू ऐकत न्यायालयाने वानखेडेंना सीबीआयच्या चौकशीत सहकार्य करण्याचे निर्देश देताना अटकेसारख्या कठोर कारवाईपासून आजपर्यंत (8 जून) त्यांना अंतरिम संरक्षण दिले आणि वानखेडेंच्या याचिकेवर उत्तर दाखल करण्याचे निर्देश सीबीआयला दिले होते.
म्हणून सीबीआयने वानखेडेंविरोधात नियमित एफआयआर नोंदवला
एनसीबीने याप्रकरणी लेखी तक्रार केल्यानंतर वानखेडे आणि अन्य आरोपींविरोधात भ्रष्टाचार, गुन्हेगारी कारस्थान व धमक्यांद्वारे खंडणीचा प्रयत्न, असे वानखेडे व अन्य काहींवर आरोप आहेत. या आरोपांबाबत प्रथमदर्शनी पुरावेही आहेत. या प्रकरणाचा तपास प्राथमिक टप्प्यावर असून तो पूर्णपणे निष्पक्ष पद्धतीने सुरू आहे. त्यामुळे वानखेडेंना दिलेले अंतरिम संरक्षण मागे घ्यावे’, असे सीबीआयने आपल्या प्रतिज्ञापत्रात नमूद केले. वानखेडे यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यापूर्वी ऑक्टोबर २०२१ मध्ये भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १७ए अंतर्गत चौकशीसाठी मंजुरी घेण्यात आली होती. त्यामुळे  सध्याची कारवाई ही कायद्याच्या चौकटीत आहे, असा दावाही सीबीआयने प्रतिज्ञापत्रात केला आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाल सीबीआयच्या विनंतीवर आता काय निर्णय घेणार याकडे सर्वाचं लक्ष लागल आहे. समीर वानखेडेंना मिळालेला दिलासा कायम राहणार की त्यांच्या अडचणी आणखी वाढणार हे पाहावे लागेल.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -