मुंबईः राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जाणता राजा म्हणावे की नाही यावरुन सध्या राजकीय कलगितुरा रंगला आहे. मात्र शरद पवार हे जाणता राजा आहेत, असे वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसचे आमदार छगन भुजबळ यांनी गुरुवारी केले.
ते म्हणाले, जो राज्यकर्ता असतो, त्याला पूर्वी जाणता राजा असे म्हटले जायचे. शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत. त्यांनी जनतेचे प्रश्न पोटतिडकीने सोडवले आहेत. सत्ता गेली तरी चालेल पण मराठवाडा विद्यापीठाला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देणारचं असे पवार यांनी सांगितले होते. त्यानुसार त्यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नाव बदलून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठावाडा विद्यापीठ असे केले. वंचितांचे, शेतकऱ्यांचे प्रश्न शरद पवार यांनी सोडवले.
केंद्रीय राजकारणातही शरद पवार सक्रिय होते. केंद्रीय कृषीमंत्री असताना शरद पवार यांनी कृषी क्षेत्रात अमुलाग्र बदल केले. मुंबई, पुणे, नाशिक येथे शरद पवार यांनी अनेक उद्योग आणले. शिक्षण व सामाजिक क्षेत्रातही शरद पवार यांचे योगदान मोठे आहे. समाजासाठी एवढे काम करणाऱ्या नेत्याला जाणता राजा म्हणणे काही अयोग्य नाही, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनात सभागृहात भाषण करताना संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख केला होता. यावरुन भाजपने त्यांच्यावर टीका केली. राज्यभरात भाजपने आंदोलन केले. अजित पवार यांच्या वक्तव्याचा निषेध केला. शरद पवार यांनी मात्र याप्रकरणी सावध भूमिका घेतली. संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हणायचे असेल तर त्यांनी म्हणावे व ज्यांना स्वराज्य रक्षक म्हणायचे असेल त्यांनी तसे म्हणावे, असे शरद पवार यांनी स्पष्ट केले.
त्यानंतर अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली व आपण आपल्या वक्तव्यावर ठाम आहोत, असे सांगितले. त्यावेळी अजित पवार यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. शरद पवार यांना जाणता राजा म्हटले जाते हे योग्य आहे का, असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. आम्ही कुठे म्हणतो शरद पवार यांना जाणता राजा म्हणा, असे उत्तर अजित पवार यांनी दिले होते. याबाबत छगन भुजबळ यांना गुरुवारी प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवार हे जाणता राजाच आहेत, असे उत्तर भुजबळांनी दिले.