कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक शिवसेना व भाजपने स्वबळावर लढवली. या निवडणूकीनंतर सभापती व उपसभापती ही पदं शिवसेनेकडे आली. सभापती-उपसभापती ही दोन्ही पंद शिवसेनेकडे असताना सेनेच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला. आणि भाजपला उपसभापतीपद देण्यात आलं. शिवसेनेच्या या कृतीमुळे शिवसेनेत अंतर्गत वाद निर्माण झाला आहे. शिवसैनिक संतप्त झाले आहेत. या कारणावरून संतप्त शिवसैनिकांनी थेट कल्याण जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे यांनाच धारेवर धरलं. त्यांना जाब विचारला आहे. तसेच कल्याण लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेला मतदान न करण्याचा इशारा दिला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत शिवसेना व भाजप स्वतंत्रपणे लढले होते. सेनेचे ८, भाजपचे ६ राष्ट्रवादीचे २ आणि मनसे १ अपक्ष १ अशी लढत झाली होती. मात्र सेामवारी झालेल्या सभापती व उपसभापतीपदाच्या निवडणुकीत सेनेचे कपिल थळे हे सभापती तर भाजपचे प्रकाश भोईर बिनविरोध निवडून आले. उपसभापतीपदासाठी सेनेच्या मंगल म्हस्के यांनी उमेदवारी अर्ज सादर केला होता. मात्र त्यांना माघार घेण्यास सांगितल्याने शिवसैनिक संतप्त झाले होते. कल्याण जिल्हा प्रमुख लांडगे यांच्यासमोर शिवसैनिकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली.
निवडणुकीला स्थानिक कार्यकर्त्यांनी काम करून हे यश मिळवलं. त्यावेळी एकही नेता आला नाही. बाजार समितीत शिवसेनेची एक हाती सत्ता येत असतानाही भाजपला उपसभापतीपद का दिलं? असा सवाल शिवसैनिकांनी केला. शिवसेना संपविण्याचे काम सुरू असून, केवळ भाजपच्या केसेस घेण्यासाठीच सेनेत राहायचे ? असा संतप्त सवालही शिवसैनिकांनी उपस्थित केला. तसेच पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला उपसभापतीपद दिल का? असे अनेक सवाल उपस्थित केले. शिवसैनिकांनी लोकसभेच्या निवडणुकीत शिवसेनेचे काम करणार नसल्याचे लांडगे यांना सांगितले. शिवसैनिकांचा रोष अधिकच होता, त्यामुळे शिवसैनिकांची नाराजी शिंदे यांना भोवण्याची शक्यता नाकारता येत नाही.