घरमुंबईकेईएममध्ये पावसाळ्यासाठी 'स्पेशल फिवर' ओपीडी

केईएममध्ये पावसाळ्यासाठी ‘स्पेशल फिवर’ ओपीडी

Subscribe

मुंबईतील रुग्णांमध्ये तापाचे प्रमाण वाढल्यामुळे केईएम हॉस्पिटलमध्ये स्पेशल फिवर ओपीडीची सुविधा देण्यात आली आहे. पावसामुळे तापाच्या रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होते, त्यामुळे या स्पेशल ओपीडीची मदत रुग्णांना घेता येणार आहे.

वातावरणात आलेला थंडावा आणि हवेतील ओलसरपणा यामुळे डेंग्यू आणि मलेरियाच्या तापाने मुंबई फणफणली आहे. जसजसा पावसाचा जोर कमी- जास्त होतो, तशी संसर्गजन्य आजारांमध्ये वाढ होत जाते. याच पार्श्वभूमीवर पालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही तापासाठी विशेष ओपीडी सुरू करण्यात आली आहे. ज्या मुंबईकरांना कामावर जाण्याच्या घाईमुळे रुग्णालयात जाऊन तपासणी करण्यासाठी वेळ मिळत नाही, अशा मुंबईकरांसाठी ही स्पेशल फिवर ओपीडी सुरू करण्यात आली आहे. पावसाळा सुरू झाला की खोकला, ताप, पोटदुखी, अंगदुखी हे आजार डोकं वर काढतात. त्यामुळे विशेष सोय म्हणून केईएममध्ये संध्याकाळी ४ ते ६ या वेळेत विशेष ओपीडी सुरू करण्यात आल्याचं केईएम हॉस्पिटलचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे यांनी स्पष्ट केलं आहे.

त्वरित उपचार घेणे आवश्यक 

अनेकदा तापावर घरगुती उपचार करून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. डॉक्टरांच्या मते, तापाकडे दुर्लक्ष केल्यास तो अधिक बळावण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी त्वरित उपचार घेणं गरजेचं आहे. ओपीडीनंतरही आपातकालीन ओपीडीत रुग्ण येतात. त्यामुळे तिथे ही मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ती गर्दी कमी करण्यासाठीच पावसाळ्यात ही विशेष ओपीडी सुरू करण्यात येतं, असं केईएमचे डॉ. आलोक सिंह यांनी सांगितलं आहे.

- Advertisement -

रुग्णांच्या संख्येत वाढ

ओपीडीत मेडिसीन आणि निवासी डॉक्टर्स उपलब्ध असतात. शिवाय एखाद्या व्यक्तीला जर जास्त ताप आला असेल तर त्याला तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करुन घेतलं जातं. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्यांची गर्दी कमी व्हावी यासाठी ओपीडीचा वेळ वाढवून घेण्यात आल्याचंही डॉ. सिंह सांगतात. पाऊस पडण्यापूर्वी दररोज ३० ते ३५ रुग्ण तपासणीसाठी येतात. परंतू पावसाला सुरूवात झाल्यानंतर रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. पाऊस पडल्यानंतर उद्भवणारे साथीचे आजार अद्याप पसरले नसले तरी रुग्णांमध्ये ताप, सर्दी, खोकला आणि घशाचा संसर्ग असलेले रुग्ण अधिक असल्याचं जनरल प्रॅक्टिशनर डॉ. सुनील लांबे यांनी सांगितले. पाऊस पडतो, मधेच ऊन येतं, या वातावरणाच्या फरकामुळे आजार वाढण्याची शक्यताही डॉ. लांबे यांनी व्यक्त केली आहे.

मलेरिया- डेंग्यूला गांभिर्याने घ्या

मलेरिया आणि डेंग्यूची लक्षणं नसल्यास रुग्णाला तापावर उपचार सुरू केले जातात. ताप नियंत्रणात आला नाही, तर या दोन्हींपैकी एका आजाराची शक्यता अधिक असू शकते. रक्त चाचणीत डेंग्यू किंवा मलेरिया स्पष्ट झाल्यास त्यानुसार उपचार केले जातात. अनेकदा रक्त चाचणीत डेंग्यू किंवा मलेरिया न आढळल्यास रुग्ण तापाकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे डोक्यात ताप जाणे, अशक्तपणा येणे, शरीरातील पाणी कमी होणे यांसारख्या तक्रारी उद्भवतात. त्यामुळे तापाकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असल्याचेही डॉक्टर वारंवार सांगतात.

- Advertisement -

काय टाळावं

अनेक रुग्ण तापाकडे दुर्लक्ष करतात. औषध विक्रेत्यांकडून एखादं औषध विकत घेऊन झटपट बरं होण्याचा विचार करतात. परंतू असं करणं जीवावर बेतू शकतं. याशिवाय योग्य ती काळजी न घेतल्यास साथीचा प्रसार होऊ शकतो. असे न करता तापात डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

काय करावं

  • छाती आणि पाठ गरम पाण्यात कापडं भिजवून दिवसातून किमान एक-दोन वेळा शेकून घ्यावं
  • बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत
  • ताप आल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

तापाची लक्षणं

अंग दुखी, घसा खवखवणे, डोळयातून पाणी येणे, सर्दी होणे, अंतर्गत ताप जाणवणं, थकल्यासारखं वाटणं, कणकण भासणं, सांधे दुखी, मळमळणं, डोकेदुखी

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -