मोबाईल दूरसंचार सेवा पुरवठा कंपन्या, केबल कंपन्यासारखाच पोर्टेबिलिटीचा पर्याय आता महाराष्ट्रातील शेतकर्यांनाही मिळणार आहे. राज्यातील महावितरणच्या कृषीपंप ग्राहकांनाही येत्या दिवसामध्ये पोर्टेबिलिटीचा पर्याय मिळणार आहे. ज्या कृषीपंप ग्राहकांना महावितरणच्या वीज वितरण यंत्रणेतून वीज पोहचलेली आहे अशा ग्राहकांनाही आगामी दिवसांमध्ये सौरपंपाचा पर्याय शेतीसाठी वापरता येण्याचा असा हा पोर्टेबिलिटीचा पर्याय आहे. त्यामुळे सौरपंपातून शेतकर्यांना दिवसा वीज उपलब्ध होईलच तसेच उरलेल्या विजेच्या माध्यमातून शेतकर्यांना विजेच्या विक्रीतूनही फायदा होणार आहे. केंद्रात ऊर्जा विभागाच्या धोरणानंतर हा पोर्टेबिलिटीचा पर्याय महाराष्ट्रात उपलब्ध होणार आहे.
सध्या महावितरणच्या वीज यंत्रणेतून ४० लाख कृषीपंप ग्राहकांना विजेचा पुरवठा करण्यात येतो. पण दोन वेगवेगळ्या वेळापत्रकानुसार ही दिवसापोटी ८ तासांची वीज उपलब्ध होते. पण केंद्राच्या कुसुम या ग्रीड कनेक्टिव्हीटीच्या योजनेच्या माध्यमातून कृषीपंपातही पोर्टेबिलिटीचा पर्याय राज्यातील वीज ग्राहकांना उपलब्ध होणार आहे. सध्याचे महावितरणच्या वीज यंत्रणेतून वीज पुरवठा असणार्या कृषीपंप ग्राहकांनाही सोलार पंप देणारी ही योजना आहे.
आयोगाची मंजुरी गरजेची
सुरूवातीला प्रायोगिक तत्वावर हा प्रकल्प राबवण्यात येईल. त्यानंतरच या प्रकल्पाची अंमलबजावणी संपुर्ण राज्यात होईल असे महावितरणच्या एका वरिष्ठ अधिकार्याने सांगितले. राज्य वीज नियामक आयोगाकडे यासाठी महावितरणला एग्रीड टॅरिफ म्हणजे संमतीचा वीजदर यासाठीची याचिका करावी लागेल. आयोगाच्या मंजुरीनंतरच हा पर्याय कृषीपंप ग्राहकांसाठी उपलब्ध होईल असे त्या अधिकार्याने स्पष्ट केले.