गोरगरिबांना स्वस्तात पोटभर जेवण मिळावं याकरिता उल्हासनगरमध्ये टीम ओमी कलानी यांच्या टीओके रसोईने अनोखा उपक्रम राबवला आहे. टीओके रसोईमध्ये अवघ्या १० रुपयामध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. या उपक्रमाचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते करण्यात आले.
उल्हासनगरकरांना मिळणार १० रुपयात जेवण
सध्या १० रुपयात साधा वडापाव मिळत नाही. मात्र उल्हासनगरातील “टीओके रसोई” मध्ये १० रुपयांमध्ये पोटभर जेवण मिळणार आहे. १० रुपयात चपात्या आणि वाटीभर भाजी मिळणार आहे. उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांनी टीओके महिला बचत गटांच्या माध्यमातून हा उपक्रम सुरु केला आहे. याचे उदघाटन आज राज्यमंत्री रविंद्र चव्हाण आणि महापौर पंचम कलानी यांच्या हस्ते करण्यात आले.
१५ ते २० शाखा सुरु होणार
या उपक्रमामुळे महिला बचत गटातील महिलांना रोजगार मिळाला आहे. या महिलांना भविष्यात कॅटरिंग सर्विसेस सुरु करता यावे, यासाठी साहित्य वाटप करण्यात येणार असल्याचे राज्यमंत्री रविंद्र चव्हाण यांनी सांगितले. या उदघाटनावेळी बोलताना ओमी कलानी यांनी सांगितले की, टीओके रसोईचा येत्या काळात शहरभरात १५ ते २० शाखा सुरु होणार आहेत. मध्यवर्ती रसोईमध्ये जेवण बनवून ते इतर शाखांमध्ये पाठविण्यात येणार आहे. प्रत्येक ताटाला २ रुपये उत्पन्न महिला बचत गटाला मिळणार आहे. कोणालाही वाढदिवसानिमित्त शहरवासीयांना गोड मिष्टान्न द्यायचे असल्यास ते टिओके रसोई मार्फत देऊ शकतात, असे ही ओमी कलानी यांनी सांगितले.
हेही वाचा –