मराठा क्रांती मोर्चाच्या बाबतीत शिवसेनेच्या मुखपत्रात वादग्रस्त व्यंगचित्र काढल्याप्रकरणी सप्टेंबर २०१६ रोजी पुसद न्यायालयाने ‘सामना’चे संपादक संजय राऊत, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई आणि राजेंद्र भागवत यांच्याविरुद्ध समन्स बजावले होते. अॅड. दत्ता सुर्यवंशी यांनी ही तक्रार दाखल केली होती. मात्र त्यानंतर समन्स बजावूनही उद्धव ठाकरे आणि इतर लोकं कोर्टात हजर न झाल्याने आता त्यांच्याविरोधात वॉरंट जारी करण्याचे आदेश देण्यात आले आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात वॉरंट जारी. मराठा क्रांती मोर्चाबाबत 'सामना'मध्ये वादग्रस्त व्यंगचित्र काढले होते, याप्रकरणी समन्स बजावून हजर न झाल्याने कोर्टाने वॉरंट जारी करण्याचे आदेश दिले आहेत. pic.twitter.com/jTH7sqn9ho
— My Mahanagar (@mymahanagar) April 23, 2019
काय आहे प्रकरण?
कोपर्डी येथे शालेय विद्यार्थीनीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्यानंतर संतप्त झालेल्या मराठा समाजाच्यावतीने राज्यभरात मुक मोर्चे काढण्यात आले होते. या मोर्चांना राज्यभरात प्रचंड प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. मात्र याचदरम्यान शिवसेनेचे मुखपत्र दैनिक सामनामध्ये या मोर्चाची टिंगल करणारे व्यंगचित्र छापून आले होते. याविरोधात मराठा समाजात संतप्त प्रतिक्रिया उमठल्या होत्या. यवतमाळमध्ये या व्यंगचित्राविरोधत अॅड. दत्ता सुर्यवंशी यांनी २६ सप्टेंबर २०१६ रोजी पुसद न्यायालयात तक्रार दाखल केली होती. व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या असून दोषींवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. याच प्रकरणी सुनावणी करताना न्यायालयाने चौघांना १९ डिसेंबरला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.