महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी) नोटीस बजावण्यात आली असून २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणात झालेल्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आली आहे. आता या प्रकरणावर मनसेकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून अशा नोटीशीला भीक घालत नाही, असा इशारा मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिला आहे. तसेच भाजपा सरकारबाबत बोलताना आमचा हिटलरशाही विरोधात लढा सुरुच राहील, असेही त्यांनी म्हटले आहे.
Sandeep Deshpande,Maharashtra Navnirman Sena(MNS):ED has summoned MNS chief Raj Thackeray (in connection with Kohinoor building case) only to build pressure. No ED inquiry has been done against any top leader of BJP in last 5-6 yrs. We'll continue our fight against ‘Hitlershahi’. pic.twitter.com/rfJgQAz7ek
— ANI (@ANI) August 19, 2019
काय म्हणाले संदीप देशपांडे
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन भारताचे नवीन हिटलर आहेत. तुमच्या विरोधात बोलेल, तुमची प्रकरणं बाहेर काढेल, तुमचा खोटारडेपणा बाहेर काढेल त्याच्यावरुद्ध दाबावतंत्राचा वापर करायची भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे. सीबीआय असेल किंवा ईडी असेल या आता स्वायत्त संस्था राहिलेल्या नाहीत तर त्या भाजपाच्या कार्यकर्त्या झालेल्या आहेत. अशा भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं हे मनसेला चांगलं माहिती आहे. त्यापद्धतीनेच आम्ही डील करु, अरे संदीप देशपांडे यांनी सांगितले.
काय आहे प्रकरण
मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांना ईडी कडून नोटीस मिळाली आहे. २२ ऑगस्ट रोजी त्यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोहिनूर मिल प्रकरणी नोटीस देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांच्या पुढाकारने ईव्हीएम ऐवजी बॅलेटपेपरवर निवडणूक घ्यावी यासाठी विरोधी पक्षांची संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत “मला अजूनतरी ईडीकडून हॅलो आलेले नाही” असे उत्तर राज ठाकरे यांनी दिले होते. राज ठाकरेंनी ईव्हीएमच्या विरोधात आघाडी उघडल्यामुळेच त्यांच्यावर ही कारवाई होत असल्याचा आरोप आता मनसेच्यावतीने होत आहे.