मुसळधार पावसाचा सर्वाधिक तडाखा रायगड जिल्ह्याला बसला आहे. पूरामुळे तेथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक घरात पाणी शिरल्याने घरातील वस्तूंची नासाडी झाली. अनेक छोट्या मोठ्या उद्योगधंद्यांनाही याचा फटका बसला आहे. दरम्यान, काही ठिकाणी पूर ओसरला असला तरी, पूर ओसरताच पूरामुळे झालेल्या नुकसानाचे विदारक चित्र समोर आले आहे. कर्जत तालुक्यातील पोल्ट्री फार्मला पूराच्या पाण्याचा मोठा फटका बसला असून तब्ब्ल दहा हजारांपेक्षा अधिक कोंबड्यांचा बुडून मृत्यू झाला आहे. तर शंभर पेक्षा अधिक शेळ्या पूराच्या पाण्यात वाहून मृत झाल्या आहेत.
पाली भूतीवली आदिवासी वाडी वरील भगवान भूगरकर यांच्या २४ शेळ्या मृत झाल्या आहेत . कुशीवली येथील ३५ शेळ्या मृत पावल्या आहेत. सांगवी येथील फार्म हाऊस मधील १७ शेळ्या ,४ खेचर ,१ वासरू मृत पावले. उकरूल येथील पुंडलिक खडे यांच्या २२ शेळ्या मृत पावल्या . उकरूळ येथील मिलिंद थोरवे यांच्या पोल्ट्री फार्म मधील १४०० कोंबड्या पूराच्या पाण्यामुळे मृत पावल्या . माळवाडी पोल्ट्रीतील शेकडो कोंबड्या मृत पावल्या . कळंब येथील तीन पोल्ट्री मधील मिळून तब्बल ९ हजार पेक्षा अधिक कोंबड्या मृत झाल्या. तहसीलदार विक्रम देशमुख यांच्या आदेशानुसार तलाठ्यांनी तातडीने पंचनामे केले असून, तसा अहवाल तहसील कार्यालयाकडे सादर केला आहे.
पोल्ट्री फार्म धारकांना एकामागोमागएक फटका
कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनमुळे अनेक निर्बंध लादले गेले होते. त्यामुळे अनेक उद्योगधंदे ठप्प झाल्याने याचा फटका अनेक व्यवसायिकांना बसला होता. याशिवाय बर्ड फ्लूमुळेही पक्ष्यांच्या संपर्कात येणाऱ्या व्यवसायांनादेखील धोका निर्माण झाला होता. पोल्ट्री फार्ममध्ये काम करणारे लोक सतत पक्ष्यांच्या थेट संपर्कात येतात, त्यामुळे त्यांनाही याचा फटका बसला. याशिवाय आता अतिवृष्टीमुळे कर्जतच्या पूराचा पोल्ट्री फार्म धारकांना मोठा फटका बसला आहे.
हेही वाचा – Live Update : म्हाडा वसवणार नवे दरडग्रस्त तळीये गाव, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची घोषण