खालापूर तालुक्यातील माणकिवली ग्रामपंचायतीच्या बोअरवेलपासून ते डोलवली येथे असणार्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाणार्या मेन लाईनवर अवैधरित्या नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. या प्रकरणी कारवाई करण्याऐवजी सरपंच आणि ग्रामसेवक एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहेत. या प्रकरणी कारवाईचा आपल्याला अधिकार नसल्याचा दावा दोघांनीही केला आहे. त्यामुळे हे मेन लाईनवरील अवैध नळ कनेक्शन तोडणार का? अवैधरित्या नळ कनेक्शन घेणार्यांवर गुन्हा दाखल होणार का? की त्यांना ‘राजाश्रय’ मिळणार असा सवाल ग्रामस्थ विचारत आहेत.
माणकिवली ग्रामपंचायतीच्या बोअरवेलपासून ते डोलवली येथे असणार्या पिण्याच्या पाण्याच्या टाकीपर्यंत जाणार्या मेन लाईनवर मागील ८ ते ९ महिन्यांपासून अवैधरित्या नळ कनेक्शन घेण्यात आले आहे. कनेक्शन जोडल्यांनतर या पाईपलाईनवर माती टाकण्यात आली होती. पावसाळ्यात पाण्याने माती धुवून गेल्याने ही पाईपलाईन दिसू लागली. मेन लाईनवरून अनधिकृत कनेक्शन घेतल्याचे ग्रामपंचायतीच्या एका कर्मचार्याला समजल्यानंतर तो या ठिकाणी पाहणीसाठी आला. मात्र, नळ कनेक्शन घेणार्यांनी त्याला दमदाटी करत पंचायतीचे सगळे गैरव्यवहार उघकीस आणू अशी धमकी दिली. कनेक्शन घेणार्यांवर अद्याप कारवाई न झाल्याने नक्की ग्रामपंचायतीचे कोणत्या गैरव्यवहाराचे धागेदोरे अनधिकृत नळ कनेक्शन घेणार्याकडे आहेत? असा सवाल येथील ग्रामस्थ विचारत आहेत.
हे नळ कनेक्शन कोणी घेतले? त्याकडे दुर्लक्ष का करण्यात आले? आणखी किती लोकांनी अशाच पद्धतीने मुख्य लाईनवरून नळ कनेक्शन घेतले आहेत? नियमांचा हवाला देत अधिकृत नळ कनेक्शन देण्यास नकार देणारे खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायत त्यांचा शोध घेणार का? असेही प्रश्न ग्रामस्थ उपस्थित करत आहेत.
माणकिवली ग्रामपंचायतीच्या ८ घरांनी २४ हजार ४२६ रूपये घरपट्टी भरली आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून अर्ज करूनही ग्रामपंचायतीकडून या घरांना नळ कनेक्शन दिले जात नाही. याची तक्रार घर मालकाने खालापूर तालुक्याचे तहसीलदार व पंचायत समितीचे गट विकास अधिकारी (बीडीओ) शिवाजी पुरी यांच्याकडे केली आहे. मात्र, मेन लाइनवरून नळ कनेक्शन देता येत नाही. या मेन लाइनवरून कोणी नळ कनेक्शन घेतले तर त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करून गुन्हे दाखल करण्यात येईल असे गट विकास अधिकारी यांनी सांगितले आहे. मात्र, आता उघडकीस आलेल्या या अवैध नळ कनेक्शनबाबत ते मूग गिळून बसले आहेत.
सदर नळ कनेक्शन अवैध असून मी नवीन असल्याने मला त्याबाबत पुरेशी माहिती नाही. मात्र, मी जाऊन पाहणी करते. पण कारवाईचा अधिकार हा सरपंचानांच आहे. अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाईबाबतचा ठराव सभेत पारीत करावा लागेल.
– सखूबाई कडाळे, ग्रामसेवक, माणकिवली ग्रामपंचायत
अवैध नळ कनेक्शन धारकांवर कारवाई झालीच पाहिजे. ग्रामसेवक यांनी पाहणी करून गुन्हा दाखल करावा.
– चंदन भारती, सरपंच, माणकिवली ग्रामपंचायत