इंग्लंडमध्ये बाकी क्रिकेटर्सप्रमाणेच जेम्स अँडरसनसाठीदेखील अॅशेस टेस्ट क्रिकेट सर्वात महत्त्वाचं आहे. मात्र २०१२ मध्ये भारताविरुद्ध केलेल्या खेळीला तो आपली सर्वोत्कृष्ट खेळी मानतो. १ ऑगस्टपासून बर्मिंगहममध्ये भारत विरुद्ध इंग्लंडच्या पाच टेस्ट मॅचला सुरुवात होत आहे. त्याचंच निमित्त साधून इंग्लंडचे माईंडगेम सुरु झाले आहेत. दक्षिण आफ्रिका क्रमांक एकवर असताना आम्ही त्या टीमशी खेळलो असून भारताचाही दर्जा माझ्या नजरेत तोच आहे असं जेम्स अँडरसननं म्हटलं आहे. खेळापूर्वी माईंडगेम सुरु करायची ही काही इंग्लंडची पहिलीच वेळ नाही.
काय म्हणणं आहे जेम्सचं?
जेम्सच्या म्हणण्याप्रमाणं २०१२ मध्ये भारताविरुद्ध त्याची सर्वश्रेष्ठ खेळी होती. भारतात केवळ स्पिनर्सना विकेट मिळतात असं म्हणत असताना भारतात फास्ट बॉलरनं येऊन कमाल करून दाखवणं हे कौतुकास्पद असते. माझ्या करिअरमधली ती अशी सिरीज होती, ज्याचा मला आयुष्यभर अभिमान असेल असंही जेम्सनं सांगितलं. इतकंच नाही तर, भारतातील या खेळीला अॅशेससमान त्यानं म्हटलं आहे. २०१२ मध्ये झालेल्या या सिरीजमध्ये अँडरसननं चार मॅचमध्ये १२ विकेट्स घेतल्या होत्या आणि ही सिरीज इंग्लंडनं २-१ च्या फरकानं जिंकली होती.
भारत आणि इंग्लंडमध्ये नेहमीच चुरस
जेम्सच्या सांगण्यानुसार, भारत आणि इंग्लंडमध्ये नेहमीच चुरस राहिली आहे. प्रत्येक सिरीजमध्ये नेहमीच उत्कृष्ट दर्जाचा खेळ खेळला जातो. एक इंग्लिश क्रिकेटर म्हणून माझ्यासाठी अॅशेस सर्वकाही आहे. ऑस्ट्रेलियाचे खेळाडूदेखील हेच उत्तर देतील. टेस्ट क्रिकेटमध्ये त्यापेक्षा मोठं काहीही नाही आणि त्यामध्ये जिंकणं हेच आमचं ध्येय असतं हे त्यानं स्पष्ट केलं आहे. मात्र मी सर्व चांगल्या टीमसह खेळू इच्छितो असंही त्यानं सांगितलं आहे. भारताच्या आव्हानाची सध्या वाट पाहात असून इंग्लंडचे वरीष्ठ खेळाडू चांगलं खेळतील असा विश्वास त्यानं दर्शवला आहे. तर स्टुअर्ट ब्रॉडबरोबर आपली नेहमीच चांगली भागीदारी राहिली असून पुढेदेखील ती तशीच राहील असा विश्वासही त्यानं व्यक्त केला आहे.