भारत आणि न्यूझीलंडमधील कसोटी मालिकेतील दुसरा आणि शेवटचा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना पहिल्या डावात १०९.५ षटकांत सर्वबाद ३२५ धावा केल्या होत्या. पहिल्या डावात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने विक्रमी १० बळी घेऊन नव्या इतिहासाची नोंद केली होती. दरम्यान न्यूझीलंडचा संघ पहिल्या डावात फक्त ६२ धावांवर सर्वबाद झाला होता. भारताने दुसऱ्या डावात ७ बाद २७६ धावांची खेळी करून न्यूझीलंडला ५४० धावांचे आव्हान दिले आहे. भारताकडून दुसऱ्या डावात देखील मयंक अग्रवालने शानदार खेळी करून भारताला मजबूत स्थितीत पोहचवले.
दरम्यान, तिसऱ्या दिवसाअखेर न्यूझीलंडची धावसंख्या ५ बाद १४० एवढी झाली आहे. त्यामुळे तिसऱ्या दिवसाअखेर भारताला विजयासाठी ५ बळींची आवश्यकता आहे. तर न्यूझीलंडला ४०० धावांचे आव्हान असणार आहे. न्यूझीलंडचा निम्मा संघ माघारी पाठवण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. तिसऱ्या दिवसाअखेर देखील सामन्यावर भारतीय संघाचेच वर्चस्व राहिले. न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात डेरी मिचेल वगळता कोणत्याच फलंदाजाला साजेशी खेळी करता आली नाही. डेरी मिचेलने सर्वाधिक ६० धावा केल्या तर हेन्री निकोल्स ३६ धावांवर नाबाद खेळत आहे. सध्या न्यूझीलंडकडून रचिन रवींद्र आणि हेन्री निकोल्स खेळत आहेत.
Stumps on Day 3 of the 2nd Test.#TeamIndia 5 wickets away from victory.
Scorecard – https://t.co/KYV5Z1jAEM #INDvNZ @Paytm pic.twitter.com/C7luRRTwNk
— BCCI (@BCCI) December 5, 2021
दुसऱ्या डावात देखील भारतीय गोलंदाजांनी चमकदार कामगिरी केली. भारताकडून रवीचंद्रन अश्विनने सर्वाधिक ३ बळी पटकावले तर अक्षर पटेलला १ बळी घेण्यात यश आले. दरम्यान, दुसऱ्या डावात न्यूझीलंडकडून एजाज पटेलने ४ तर रचिन रवींद्रने ३ बळी घेतले. भारताकडून दुसऱ्या डावात मयंक अग्रवालने सर्वाधिक ६२ धावा केल्या. तर शुभमन गिल आणि चेतेश्वर पुजारा यांनी प्रत्येकी ४७-४७ धावांची खेळी केली. तर अक्षर पटेलने २६ चेंडूत ४१ धावांची नाबाद खेळी केली.