लोकेश राहुल आणि कृणाल पांड्या यांनी केलेल्या फटकेबाजीच्या जोरावर इंग्लंडविरुद्ध पहिल्या एकदिवसीय सामन्यात भारताने ५० षटकांत ५ बाद ३१७ अशी धावसंख्या उभारली. भारताची ४०.३ षटकांत ५ बाद २०५ अशी धावसंख्या होती. मात्र, कृणाल आणि राहुलने फटकेबाजी केल्यामुळे भारताने अखेरच्या १० षटकांत ११२ धावांची भर घातली. एकदिवसीय मालिकेआधी झालेल्या टी-२० मालिकेत राहुलला चांगली कामगिरी करण्यात अपयश आले होते. मात्र, पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्याने अप्रतिम फलंदाजी करत ४३ चेंडूत ४ चौकार आणि ४ षटकारांच्या मदतीने नाबाद ६२ धावांची खेळी केली. त्याला कृणालने ३१ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५८ धावा करत उत्तम साथ दिली.
Century stand ✅
Half centuries for @klrahul11 & @krunalpandya24 ✅
300+ on the board ✅Brilliant batting display from #TeamIndia as they post 317/5 in 50 overs. @Paytm #INDvENG pic.twitter.com/9iU3lmZQBz
— BCCI (@BCCI) March 23, 2021
धवनचे शतक हुकले
या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी ६४ धावांची सलामी दिल्यावर रोहितला (२८) बेन स्टोक्सने बाद केले. मात्र, धवन आणि कर्णधार विराट कोहलीने १०५ धावांची भागीदारी रचली. मार्क वूडने कोहलीला (५६) बाद करत ही जोडी फोडली. तर धवनचे शतक केवळ दोन धावांनी हुकले. त्याला ९८ धावांवर स्टोक्सने माघारी पाठवले.
अय्यर, हार्दिक अपयशी
श्रेयस अय्यर (६) आणि हार्दिक पांड्या (१) फार काळ खेळपट्टीवर टिकले नाहीत. मात्र, राहुल (नाबाद ६२) आणि कृणाल (नाबाद ५८) यांनी अखेरच्या षटकांत फटकेबाजी केली. त्यामुळे भारताने ५० षटकांत ५ बाद ३१७ अशी धावसंख्या उभारली. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने तीन, तर मार्क वूडने दोन विकेट घेतल्या.