भारताने नागपूर कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियावर एक डाव आणि १३२ धावांनी विजय मिळवला. हा कसोटी सामना जिंकत बॉर्डर गावस्कर करंडक स्पर्धेतल्या ४ सामन्यांच्या मालिकेत १-०ने आघाडी घेतली आहे. विशेष म्हणजे पहिल्या डावांत तीन विकेट्स घेणाऱ्या अश्विनने दुसऱ्या डावांतही कमाल गोलंदाजी करत कांगारुंना गुडघे टेकायला लावले. अश्विनने ५ फलंदाजांना बाद करुन एक मोठा विक्रम केला. (India Vs Australia Test Match Ravichandran Ashwin Second Indian Bowler Take 25 Time Five Wickets)
आर. अश्विन याने सामन्याच्या पहिल्या डावात १५.५ षटके टाकत कांगारुंच्या ३ फलंदाजांना तंबूत पाठवले. तसेच, दुसऱ्या डावात अश्विनने आक्रमक गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना धावसंख्या करू दिले नाही. ऑस्ट्रेलियाच्या सुरुवातीच्या ७ विकेट्सपैकी ५ विकेट्स अश्विन याने घेतल्या.
या इनिंगमध्ये अश्विनने ५ बळी टिपून अनिल कुंबळेच्या मोठ्या विक्रमाशी बरोबरी केली. आर अश्विनने भारतात तब्बल २५ वेळा एका डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. याआधी केवळ अनिल कुंबळेने भारतात खेळताना २५ डावात ५ किंवा त्यापेक्षा जास्त विकेट घेण्याचा विक्रम केला होता. त्याचवेळी, आर अश्विनने तब्बल ३१ वेळा कसोटीच्या एका डावात ५ किंवा त्यापेक्षा अधिक विकेट्स घेतल्या आहेत.
अश्विन हा बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील दुसरा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. अनिल कुंबळे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमधील सर्वात यशस्वी गोलंदाज आहे. त्याच्या नावावर १११ विकेट्स आहेत. यानंतर आर अश्विनने या पंक्तीत स्थान मिळवलं आहे. त्याचबरोबर हरभजन सिंग ९५ विकेट्ससह तिसऱ्या क्रमांकावर आहे.
पहिल्या डावांत रवींद्र जाडेजाने ५ बळी टिपून ऑस्ट्रेलियाला १७७ धावांत रोखले. पॅट कमिन्स याच्या नेतृत्वाखालील कांगारू संघाचा १ डाव आणि १३२ धावांनी पराभव करून भारताने ४ सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
हेही वाचा – IND vs Aus : अश्विन-जडेजाच्या फिरकीची कमाल; भारताचा 132 धावांनी ऑस्ट्रेलियावर विजय