सूर्यकुमार यादवचे अर्धशतक आणि गोलंदाजांनी केलेल्या भेदक माऱ्याच्या जोरावर भारताने चौथ्या टी-२० सामन्यात इंग्लंडवर ८ धावांनी मात केली. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या या मालिकेत २-२ अशी बरोबरी केली. या सामन्यात भारताने दिलेल्या १८६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडला २० षटकांत ८ बाद १७७ धावाच करता आल्या. सलामीवीर जेसन रॉय (४०), जॉनी बेअरस्टो (२५) आणि बेन स्टोक्स (४६) यांनी फटकेबाजी करत इंग्लंडला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना इतरांची फारशी साथ लाभली नाही. भारताकडून शार्दूल ठाकूरने ४२ धावांत ३ विकेट घेतल्या. त्याला हार्दिक पांड्या आणि लेगस्पिनर राहुल चहर यांनी २-२ विकेट घेत उत्तम साथ दिली. त्यामुळे भारताने हा सामना जिंकत मालिकेत २-२ अशी बरोबरी केली.
Jofra Archer’s brilliant cameo goes in vain as India defeat England by 8 runs in the fourth T20I 👏
The series is now tied at 2-2.#INDvENG ➡️ https://t.co/rqFjwUKgNG pic.twitter.com/ZbcsFVGZcj
— ICC (@ICC) March 18, 2021
सूर्यकुमारचे पहिलेवहिले अर्धशतक
त्याआधी या सामन्यात इंग्लंडचा कर्णधार इयॉन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. भारताचे सलामीवीर रोहित शर्मा (१२) आणि लोकेश राहुल (१४) यांना फार धावा करता आल्या नाहीत. मागील दोन सामन्यांत अर्धशतके करणारा भारताचा कर्णधार विराट कोहली केवळ १ धाव करून माघारी परतला. सूर्यकुमारने मात्र दुसऱ्या बाजूने अप्रतिम फलंदाजी करत २८ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३१ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकारांच्या मदतीने ५७ धावांची खेळी केली. तो बाद झाल्यावर अखेरच्या षटकांत रिषभ पंत (३०) आणि श्रेयस अय्यर (३७) यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे भारताने २० षटकांत ८ बाद १८५ अशी धावसंख्या उभारली.