भारतीय संघाने क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटसाठी २ कर्णधार बनवले आहेत. बीसीसीआयने मंगळवारी याबाबतची अधिकृत घोषणा केली होती. आता विराट केवळ कोहली कसोटी संघाचा कर्णधार असणार आहे. त्याचबरोबर रोहित शर्माला एकदिवसीय आणि टी-२० संघाचे कर्णधार बनवण्यात आले आहे. १२ कसोटी खेळणाऱ्या देशांमध्ये काही देशांनी पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये वेगवेगळे कर्णधार बनवले आहेत त्यामध्ये आता भारतीय संघाचा देखील समावेश झाला आहे. यामध्ये यापूर्वी पासून इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका या संघाचा समावेश आहे. तर पाकिस्तान, न्यूझीलंड, आयर्लंड आणि झिम्बाब्वे या संघाचा तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार आहे.
काही सामन्यांतील अपवाद वगळला तर न्यूझीलंड संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये केन विल्यमसनच्या नेतृत्वाखाली खेळत आला आहे. दोन कर्णधारांचा प्रयोग त्यांच्या संघात नाही. त्याचबरोबर पाकिस्तानकडेही तिन्ही फॉरमॅटमध्ये एकच कर्णधार आहे. पाकिस्तानचा संघ बाबर आझमच्या नेतृत्वात खेळतो. आयर्लंडचाही संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये एकाच कर्णधाराच्या नेतृत्वात खेळतो. अँड्र्यू बालबर्नी कसोटी, एकदिवसीय आणि टी-२० मध्ये आयर्लंडचा कर्णधार आहे. त्यासोबतच झिम्बाब्वेचा कर्णधार सध्या क्रेग एर्विन आहे आणि तो तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार आहे.
बांगलादेशकडे तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार
बांगलादेश संघाचे तिन्ही फॉरमॅटमध्ये वेगवेगळे कर्णधार आहेत. मोमिनुल हक कसोटी संघाचा कर्णधार आहे. तर एकदिवसीय संघाचे नेतृत्व तमीम इक्बालकडे आहे आणि महमुदुल्ला हा टी-२० क्रिकेटमध्ये बांगलादेशचा कर्णधार आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडने वेगळे कर्णधार बनवून विश्वचषक जिंकला आहे. ऑस्ट्रेलियाने यंदाचा टी-२० विश्वचषक जिंकला आहे. त्यासोबतच इंग्लंडच्या संघाने २०१९ चा एकदिवसीय विश्वचषक जिंकला आहे.