मुंबईचे माजी क्रिकेटपटू आणि प्रख्यात प्रशिक्षक वासू परांजपे (Vasoo Paranjape) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ते ८२ वर्षांचे होते. सोमवारी माटुंगा येथील राहत्या घरी दुपारच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा आणि दोन मुली असा परिवार आहे. परांजपे यांनी १९५६ ते १९७० या कालावधीत बडोदा आणि मुंबईचे २९ प्रथम श्रेणी सामन्यांत प्रतिनिधित्व केले. क्रिकेट खेळण्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी सुनील गावस्कर, दिलीप वेंगसरकर, राहुल द्रविड, सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्मा यांसारख्या मातब्बर खेळाडूंना मार्गदर्शन केले होते. तसेच गावस्करांना त्यांनीच ‘सनी’ हे टोपणनाव दिले होते.
परांजपे यांचा २१ नोव्हेंबर १९३८ मध्ये गुजरात येथे जन्म झाला. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्यांनी २९ सामन्यांत २३.७८ च्या सरासरीने ७८५ धावा केल्या. तसेच त्यांनी नऊ विकेटही घेतल्या होत्या. त्यांनी विशेषतः मुंबई क्रिकेटमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी दादर युनियन या मुंबई क्रिकेटमधील बलाढ्य संघाकडून खेळताना उत्कृष्ट कामगिरी केली होती.
Really saddened at the demise of Vasoo Paranjape. He was an institution in the game with a real positive vibe in whatever he did. Condolences to @jats72 and the family. God bless his soul 🙏🏻 pic.twitter.com/LlIkaB242Q
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 30, 2021
क्रिकेट खेळण्यातून निवृत्त झाल्यावर त्यांनी विविध वयोगटातील राष्ट्रीय संघांना प्रशिक्षण दिले. तसेच त्यांनी राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत प्रशिक्षक म्हणूनही काम केले. त्यांचा मुलगा जतीन परांजपेने भारताकडून चार एकदिवसीय सामने खेळले. तसेच तो निवड समितीचा सदस्यही होता. वासू परांजपे यांच्या निधनाची बातमी कळताच विनोद कांबळी, रवी शास्त्री आणि अनिल कुंबळे आदींनी त्यांना आदरांजली वाहिली.
हेही वाचा – चौथ्या कसोटीसाठी टीम इंडियात बदलाची शक्यता