पाकिस्तान संघाने टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये टीम इंडियाला चांगलाच दणका दिला होता. टीम इंडियाचा १० विकेट्सने पराभव केला होता. आता टी-२० वर्ल्डकप २०२२ ला पुन्हा एकदा सुरूवात होणार असून २३ ऑक्टोबरला टीम इंडिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. तसेच हा सामना मेलबर्नमध्ये खेळवला जाणार आहे. दरम्यान, टी-२० वर्ल्डकपमध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा टीम इंडियाचा पराभव करणार असल्याची भविष्यवाणी पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू आणि वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने केली आहे.
पाकिस्तान पुन्हा टीम इंडियाचा पराभव करणार
ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२२ च्या शेड्यूलची घोषणा करण्यात आली आहे. या शेड्यूलमध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच ग्रूपमध्ये आहेत. दोन्ही संघामध्ये २३ ऑक्टोबरला पहिला सामना खेळवला जाणार आहे. शोएब अख्तरने एएनआयशी संवाद साधला. त्यावेळी तो म्हणाला की, यंदाच्या वर्षात खेळवल्या जाणाऱ्या टी-२० वर्ल्डकप २०२२ मध्ये पाकिस्तान पुन्हा एकदा टीम इंडियाचा पराभव करेल. पाकिस्तान टी-२० क्रिकेटसाठी एक उत्कृष्ट टीम आहे. तसेच टीम इंडियापेक्षाही पाक संघ मजबूत आहे. भारतातील मिडिया टीम इंडियावर नेहमीच अनावश्यक दबाव टाकत राहतं. त्यामुळे टीम इंडियासाठी सामना गमावणं हे सामान्य आहे, असं शोएब अख्तर म्हणाला.
टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात १२ सामने जिंकले
दरम्यान, टी-२० वर्ल्डकप २०२१ मध्ये टीम इंडियाने पाकिस्तानच्या विजयापूर्वी एकही सामना गमावला नव्हता. टीम इंडियाने पाकिस्तानविरोधात १२ सामने जिंकले आहेत. परंतु २०२१ च्या सामन्यात पाक संघाने टीम इंडियाचा पराभूत केला. त्यामुळे टीम इंडियासाठी ही धक्कादायक गोष्ट होती. मात्र, सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलिया संघाने पाकिस्तान संघाला हरवल्यामुळे पाक संघ टी-२० वर्ल्डकपमधून बाहेर गेली होती.
टीम इंडियाविरोधात लॉबीचं चित्र – शोएब अख्तर
मागील काही दिवसांपूर्वी शोएब अख्तरने भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीबाबत एक गंभीर व्यक्तव्य केलं होतं. विराटने कर्णधारपद स्वत:हून सोडलेले नाही तर त्याला ते सोडण्यासाठी भाग पाडण्यात आले, असा आरोप करत त्याने टीम इंडियाविरोधात लॉबीचं चित्र तयार केलंय, असं म्हटलं होतं.