घरठाणेगडकरी रंगायतनची तिसरी घंटा महिनाभर विलंबाने दिवाळी पहाट कार्यक्रमालाही ठाणेकर मुकणार

गडकरी रंगायतनची तिसरी घंटा महिनाभर विलंबाने दिवाळी पहाट कार्यक्रमालाही ठाणेकर मुकणार

Subscribe

गडकरी रंगायतनमध्ये दुरुस्तीचे काम सुरू होणार असल्यामुळे आणि या कामाला एक महिना लागण्याची शक्यता असल्याने या नाट्यगृहाची तिसरी घंटा महिनाभर विलंबाने वाजणार आहे. त्यामुळे नाट्यप्रेमींना नाटकांसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

कोरोनाच्या दुसर्‍या लाटेनंतर मराठी नाट्यप्रेमींकडून नाट्यगृहे उघडण्याची वाट पाहिली जात असतानाच, ठाणे महापालिकेच्या लेट लतिफ कारभारामुळे गडकरी रंगायतनमध्ये नाटकाची २२ ऑक्टोबरला तिसरी घंटा वाजणारच नाही, अशी टीका भाजपाचे आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्य सरकारने कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्यानंतर २२ ऑक्टोबरपासून राज्यातील नाट्यगृहे तसेच मल्टिप्लेक्स पुन्हा सुरू होत आहेत. त्यामुळे मराठी नाट्यरसिकांना पुन्हा नाटक पाहण्याची ओढ निर्माण झाली आहे. ठाणे शहराचे सांस्कृतिक प्रतिक म्हणून गडकरी रंगायतनची ओळख आहे. ठाणेकरांची नाटक पाहण्यासाठी पहिली पसंती गडकरी रंगायतनलाच असते. मात्र, आता नाट्यगृहे सुरू होत असतानाच गडकरी रंगायतनचा पडदा महिनाभर उघडणार नाही. तसेच तिसरी घंटाही वाजणार नाही. ठाणे महापालिकेने गडकरी रंगायतनच्या दुरुस्तीचे काम काढले असून, ते आणखी महिनाभर सुरू राहणार आहे. त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी पहाटच्या कार्यक्रमांबरोबरच रसिकांना नाटकालाही मुकावे लागेल.

यापूर्वी नाट्यगृहे बंद असताना महापालिकेने दुरुस्तीचे काम पूर्ण करण्याची अपेक्षा होती. मात्र, आता नाट्यगृहे सुरू होण्यापूर्वी गडकरी रंगायतनची दुरुस्ती करण्याचे काम सुरू केले आहे. महापालिकेच्या या कारभाराचा नाट्यरसिकांना फटका बसणार आहे. महापालिकेतील सत्ताधारी मराठी माणूस व मराठी संस्कृतीच्या पोकळ गप्पा मारतात. मात्र, त्यांना मराठी नाट्य रसिकांविषयी आस्था नसल्याचेच या प्रकारातून उघड झाले आहे, अशी टीका आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे.

- Advertisement -

राज्यात विविध घटकांना केव्हाच सवलत देणार्‍या महाविकास आघाडी सरकारने मुळातच नाट्यगृहावरील निर्बंध खुले करण्यास विलंब केला. त्याविरोधात कलावंतांनी आंदोलन छेडले. तर भाजपने रेटा वाढविल्याने राज्य सरकारला जाग आली आणि नाट्यगृह खुले करण्याचा मुहूर्त ठरला; पण ठाणे महापालिकेच्या लेट लतिफमुळे ठाणेकरांची उपेक्षा संपलेली नाही, असे डावखरे यांनी सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -