नागपूरः समृद्धी महामार्गाची घोषणा केलीत व हा मार्ग झाला. मात्र राज्यातील जिल्हा परिषदेच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. याकडे कोण लक्ष देणार, असा सवाल राष्ट्रवादी काॅंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी विधनापरिषदेत गुरुवारी केला.
ते म्हणाले, समृद्धी महामार्गाची घोषणा झाली. हा महामार्ग बांधण्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले. मात्र खेडापाड्यातील रस्त्यांची काय अवस्था झाली आहे हे एकदा बघा. येथे बसलेल्या प्रत्येक आमदाराने आपल्या मतदार संघाताली रस्ते एकदा जाऊन तपासायला हवेत. समृद्धी महामार्गाआडून स्वतःची समृद्धी करुन घेतली. पण गावागावातील रस्त्यांकडे दुर्लक्ष करण्यात आले, असा आरोप खडसे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचे नाव न घेता केला.
केंंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देशभरात रस्ते बांधले. ते एकमेव व्यक्तिमत्त्व आहे ज्यांच्या कामामुळे भाजपचे कौतुक होत आहे. मंत्री गडकरी यांच्यामुळे तुम्ही आहात. केंद्रात भाजपचे सरकार आहे. तुम्ही काय काम केले आहे. शिंदे-फडणवीस सरकारने केवळ घोषणा केल्या आहेत. प्रत्यक्षात काहीही केले नाही, असा आरोप खडसे यांनी केला.
पुढे खडसे म्हणाले, विर्दभ वेगळा व्हावा ही भावना निर्माण होणे हे शोभनीय नाही. हा विचार का येतो मनात. उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्र विर्दभ करण्याची मागणी केली होती. विर्दभ वेगळा होणार नाही तोपर्यंत लग्न करणार नाही, अशी भीष्म प्रतिज्ञा फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यांनी लग्नही केले. त्यांचा संसार सुरु झाला. मग का करता अशा घोषणा. का दिशाभूल करता नागरिकांची, असा सवाल खडसे यांनी केला.
दरवर्षी जसा पावसाळा येतो तसे आपण दरवर्षी नागपुरात अधिवेशन घेतो. दरवर्षी विर्दभासाठी कोट्यवधी रुपयांचे पॅकेज जाहिर केले जाते. पण त्याची अंमलबजावणी होते का हे आपण कधी तपासणार आहोत. पॅकेज देण्याला विरोध नाही. मात्र या पॅकेजचा विनियोग होतो का याचाही पाठपुरावा केला पाहिजे, अशी मागणीही खडसे यांनी केली.
विर्दभाचा विकास झालाच पाहिजे. सर्वांनी एकत्र येऊन तो करायला हवा. त्यांचा अनुशेष भरुनच काढायला हवा, अशी मागणी खडसे यांनी यावेळी केली.