पावसाळा या ऋतूला सुरूवात होण्यापुर्वीच आपण अनेक तयारी करतो. मग ती कपडे, चप्पल- बुटं यासह वॉटर प्रुफ बॅगेची खरेदी करतो मात्र या सर्व गोष्टींची तयारी करताना एक महत्त्वाच्या गोष्टींकडे नकळत दुर्लक्ष होते. ते म्हणजे मोबाईल आणि त्याची सुरक्षितता.
पावसाळ्यात मोबाईलची काळजी घेणे आवश्यक असते. पावसात मोबाईल भिजला तर तो दुरूस्त करण्यास बराच वेळ लागतो. याकरीता आजकाल अनेक मोबाईल कंपन्यांनी वॉटरप्रूफ मोबाईल देखील बाजारात उपलब्ध केले आहे. परंतु तुमचा फोन वॉटर प्रुफ नसेल तर पावसात त्याची काळजी घेणे गरजेचे असते.
पावसात मोबाईल भिजू नये म्हणून प्लास्टिक कव्हर बाजारात मिळतात. पावसामध्ये प्रवास करत असताना फोन शर्ट किंवा पॅन्टच्या खिशात न ठेवता या मिळणाऱ्या प्लास्टिक कव्हर बॅगेत ठेवा.
पावसाळ्यात बऱ्याचदा मोबाईल भिजल्याने त्यातील डेटा जाण्याची शक्यता असते अशावेळी बॅकअप घेऊन ठेवल्यास तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली माहिती तुम्हाला पुन्हा रिकव्हर करता येईल.
शक्यतो, पावसात कोठेही प्रवास करत असताना ब्लुटूथ हेडफोनचा वापर केल्यास फोन सुरक्षित राहण्यास मदत होईल.
पावसात मोबाईल भिजल्यास काय कराल
- कोणत्याही कारणाने तुमचा फोन पाण्यात भिजल्यास फोन स्वीच ऑफ करा.
- पाण्याने ओला झालेला फोन लगेच चार्ज करायला लावू नका.
- भिजलेला फोन स्वीच ऑफ केल्यावर तो टीश्यू पेपर अथवा कोरड्या सुती कापडाने पुसून कोरडा करा. ज्यामुळे फोनच्या आतील भागात पाणी जाणार नाही.
- पावसात भिजलेला फोन सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर तुम्ही करू शकता. हेअर ड्रायर नसेल तर तुम्ही फॅनच्या हवेमध्ये देखील भिजलेला फोन सुकवू शकतात.
- भिजलेला फोन तुम्ही तांदुळाच्या डब्ब्यात ठेऊ शकतात. तांदळामुळे मोबाईलची आर्द्रता शोषली जाते.
- पावसामुळे भिजलेला फोन लगेच सुरू करू नका, भिजलेल्या मोबाईलला किमान दोन दिवस तरी बंदच ठेवा.