माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता यांनी ठाकरे सरकार विरोधात ट्विटर वरून टीका केल्यानंतर त्यांच्या अॅक्सिस बँकेतील पोलीस आणि त्यानंतर ठाणे महापालिकेतील कर्मचाऱ्यांची खाती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर आता मुंबई अग्निशमन दलाच्या जवानांची खाती या बँकेतून बंद करण्याचा विचार सुरू आहे. महापौर किशोरी पेडणेकर यांनी ही खाती बंद करण्यात येतील, असे जाहीर केले. परंतु महापालिकेच्या या निर्णयामुळे अग्निशमन दलाच्या जवान आणि अधिकाऱ्यांना ३० लाख रुपयांच्या अपघात विमा सुरक्षा कवचाला मुकावे लागणार आहे.
अॅक्सिस बँकेने अग्निशमन दलाच्या जवानांना पगाराचे खाते उघडल्यास ३० लाख रुपयांचा अपघात विमा कवच योजनेचा लाभ देण्याची तयारी दर्शवली होती. त्यानुसार विधी विभागाचा अभिप्राय घेऊन तसेच स्थायी समितीच्या मान्यनेनंतर अॅक्सिस बँकेत खाते उघडण्यास परवानगी दिली. तर वर्दीवरील कर्मचार्यांना ३० लाख रुपयांच्या अपघात विम्याचा लाभ बँक खात्यावर देण्याची तयारी दर्शवल्याने याबाबत बँक आणि अग्निशमन दलामध्ये करारपत्र दाखवून पगाराचे खाते उघडण्यास सुरुवात झाली.
३० लाख अपघात विम्याला मुकावे लागणार
अग्निशमन दलाचे एकूण २ हजार ८०० कर्मचारी, अधिकारी असून त्यातील सुमारे १०० ते १ हजार २०० कर्मचार्यांनीच अॅक्सिस बँकेत पगाराचे खाते उघडले. त्यामुळे रिस्क अँड कॉस्टच्या धर्तीवर ही विम्याची रक्कम मिळणार होती. त्यानुसार ही पगाराची खाती उघडली. पण ती कर्मचार्यांवर बंधनकारक नव्हती. ती एैच्छिक होती. त्यामुळे महापालिकेने जर अॅक्सिस बँकेतून कर्मचार्यांना पगाराची खाती बंद करायला सांगितल्यास जवानांना मिळणार्या ३० लाख अपघात विम्याच्या रकमेला मुकावे लागेल.पगाराच्या खात्त्यालाच अपघात विम्याची रक्कम जोडली गेली आहे. त्यामुळे आगीच्या वर्दीच्या ठिकाणी बँकेत खाते असणार्या जवान किंवा अधिकार्याला ही विम्याची रक्कम मिळणार आहे. महापालिकेच्यावतीने ही रक्कम दिली जात नसून जर खाते बंद केल्यास या विम्याच्या रकमेला जवानांना मुकावे लागणार आहे. ही बँक भारतीय रिझर्व्ह बँकेच्या अखत्यारित येत असल्याने त्यांच्या नियमानुसारच हा लाभ दिला जाणार होता. त्यामुळे जर पगाराचे खाते बंद झाल्यास त्याचा फटका जवान आणि अधिकार्यांनाच बसणार आहे.
आरोग्य गटविमा योजना बंद
मुंबई महापालिकेतील कामागर, कर्मचाऱ्यांसाठी आरोग्य गटविमा योजना जाहीर करण्यात आली. त्यानुसार दोन वर्षे ही योजना अंमलात आली. पण तिसऱ्या वर्षी पासून ही योजना बंद झाली. मात्र, जुलै २०१७ पासून ही योजना बंद असून यासाठी नवीन निविदा काढण्यात आली. परंतु, यासाठी अद्याप एकही विमा कंपनी पुढे न आल्याने अद्याप याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळत नाही. त्यामुळे महापालिका स्वतः विमा सुरक्षा देत नाही, उलट अॅक्सिस बँकेतील खाती बंद करायला लावून अग्निशमन दलाच्या जवानांना मिळणाऱ्या विमा रकमेवर पाणी सोडायला लावले जाणार आहे.
हेही वाचा – वाडियाला दिलेल्या १३ कोटींचे श्रेय कुणाचे?