करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले होते. मात्र, आता सरकारने हळूहळू लॉकडाऊनच्या नियमांत शिथिलता आणली आहे. त्यामुळे आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) भारतीय खेळाडूंना पुन्हा सरावासाठी कधी बोलवायचे याचा विचार करत आहे. आता भारतात पावसाला सुरुवात होईल. त्यामुळे बीसीसीआय त्यानंतर म्हणजेच ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये खेळाडूंचे सराव शिबीर घेण्याचा विचार करत असल्याचे बीसीसीआयच्या अधिकार्याने सांगितले.
पावसाळा संपल्यावरच सराव शिबीर घेता येऊ शकेल. खेळाडूंना एकत्र जमवून शिबीर घेण्यासाठी आम्ही ऑगस्ट-सप्टेंबर महिन्याचा विचार करत आहोत. खेळाडूंच्या काही सवयी असतात आणि त्या पुन्हा आठवण्यासाठी काही काळ लागेल. परंतु, हे व्यावसायिक खेळाडू आहेत. लॉकडाऊनच्या काळातही हे खेळाडू फिटनेसवर मेहनत घेत होते. त्यामुळे त्यांना आता शारीरिकपेक्षा मानसिक गोष्टींवर अधिक लक्ष द्यावे लागेल, असे बीसीसीआयचा अधिकारी म्हणाला.
तसेच १४ ते १५ आठवड्यांच्या कालावधीनंतर खेळाडू पुन्हा सराव करण्यासाठी उत्सुक आहेत. सराव शिबिराला सुरुवात झाल्यानंतर चार ते सहा आठवड्यांत खेळाडू सामना खेळण्यासाठी फिट व्हावेत यासाठी चार टप्प्यांत सरावाचे स्वरूप आखण्यात येणार असल्याचे भारतीय संघाचे क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर. श्रीधर यांनी सांगितले.