राज्यात कोरोनाचा कहर सुरू असताना मुंबईत आजदेखील देशात सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत. आज दिवसभरात मुंबईत १४३० नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे राज्यातल्या ५२ हजार ६६७ रुग्णांपैकी एकट्या मुंबईत ३१ हजार ७८९ रुग्ण झाले आहेत. मुंबईत मृतांचा आकडा देखील सर्वाधिक असून आज दिवसभरात ३८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. यासह मुंबईतल्या मृतांचा आकडा एक हजारांच्या वर गेला आहे. मुंबईत एकूण १०२६ रुग्णांचा कोरोनामुळे आतापर्यंत मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे मुंबईत आज ३३० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे बरे झालेल्या रुग्णांचाही आकडा ८४०४ झाला आहे. मात्र, मृतांचा आकडा एक हजारांच्या वर जाणं ही मुंबईसाठी आणि मुंबईकरांसाठी चिंतेची बाब ठरली आहे.
आज मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींपैकी ६७ टक्के रुग्णांना इतर आजार झाले होते. यामध्ये मधुमेह – २६ टक्के, उच्च रक्तदाब – २४ टक्के, मधुमेह-उच्च रक्तदाब दोन्ही – ३२ टक्के, ह्रदयविकार – ८ टक्के आणि १० टक्के रूग्णांमध्ये इतर आजार आढळून आले होते.