बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्ष भाजपाकडून आरोप केले जात आहेत. पण या प्रकरणावरून मनसेने आदित्य ठाकरे यांची बाजू घेतली आहे. तसेच हा वाद भाजपामुळेच निर्माण झाल्याचा देखील आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाबाबत मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मनसेची भूमिका स्पष्ट करताना बाळा नांदगावकर यांनी आदित्य ठाकरे यांनी भक्कम पाठिंबा दिला आहे. ते म्हणाले की, ‘अशा प्रकारच्या घटनेत ठाकरे कुटुंबातील व्यक्तीचा सहभाग असेल, असे वाटत नाही. हा वाद भाजपच्या आरोपामुळे सुरू झाला आहे. सर्व जण या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी करत आहेत. त्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयातही हे प्रकरण गेले आहे. त्यामुळे सध्या या प्रकरणाची चौकशी होत असल्यामुळे त्यातून नेमकं सत्य बाहेर येईल.’
दरम्यान सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणावरून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर विरोधी पक्ष प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे आरोप केले जात आहेत. राजकीय आरोप-प्रत्यारोपांची चिखलफेक सुरू झाली आहे. आदित्य ठाकरे आणि शिवसेनेचा खासदार संजय राऊत यांची नार्को चाचणी करण्याची मागणी बिहार भाजपाने केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी विरोधकांकडून केल्या जाणाऱ्या आरोपांवर गेल्या आठवड्यातच उत्तर दिले आहे. ‘सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून गलिच्छ राजकरण केले जात आहे. या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबावर नाहक चिखलफेक करण्यात येत आहे. ही एकप्रकारे वैफल्यातून उमटलेली राजकीय पोटदुखीच आहे’, अशी प्रतिक्रिया आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली होती.
हेही वाचा – अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत!