घरमहाराष्ट्रअजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत!

अजित पवार पुन्हा बंडाच्या तयारीत!

Subscribe

ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळण्याचे विरोधकांचे भाकीत, दादा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट भाजपात घेऊन जाण्याचा विचारात?, अजितदादा समर्थकांना महत्त्वाची मंत्रीपदे मिळणार

‘ठाकरे सरकार दोन महिन्यांत कोसळणार’, हे माजी मुख्यमंत्री आणि भाजप खासदार नारायण राणे यांचे उद्गार खरे ठरतात की काय? अशी परिस्थिती सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण होत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुन्हा एकदा बंडाच्या तयारीत असून आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस आमदारांचा मोठा गट घेऊन ते भाजपमध्ये जातील आणि भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होईल. त्यानंतर अजितदादांच्या समर्थकांना मंत्रिमंडळात महत्वाची खाती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान पार्थ पवार यांनी गुरूवारी रात्री सिल्व्हर ओकवर जाऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंची भेट घेतली.

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकार सत्तेत येण्यापूर्वी अजितदादांनी राष्ट्रवादी काँग्रेसचा गटनेता या अधिकाराने भाजपसोबत जात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेळीच या बंडातील हवा काढून घेतल्याने दादांमागून भाजपच्या तंबूत जाण्याच्या विचारात असलेले आमदार शांत झाले आणि स्वतः दादाही गेल्या पावली परत येऊन मोठ्या पवारांचे नेतृत्व त्यांनी मान्य केले. मात्र, त्यानंतर आपल्या काकांनी आकारास आणलेले ठाकरेंचे ढकलगाडी सरकार त्यांना मान्य नाही. या संथगती सरकारमध्ये राहून दादांच्या वेगवान कारभाराला ब्रेक लागला आहे. स्वतः मंत्रालयात दहा-बारा तास काम करून हे सरकार पळत नसेल तर आपल्या एकट्याच्या मेहनतीला काही अर्थ नाही, अशी दादांची तीव्र भावना झाली आहे. विशेष म्हणजे ही भावना आणि दादांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार यांचे भाजपला ‘जय श्रीराम’ म्हणणे हा ठरवून साधलेला योग असल्याचे बोलले जाते.

- Advertisement -

शरद पवारांची धर्मनिरपेक्ष भूमिका आणि राम मंदिर पायाभरणीच्या तोंडावर त्यांनी मंदिरापेक्षा या घडीला कोरोनाशी लढायला हवे, असे मोदी सरकारला उघड सुनावले होते. पण, आजोबा एक बोलत असताना नातू पार्थने राम मंदिर पायाभरणीला पाठिंबा देत तसे थेट मोदींना पत्र पाठवत आपल्या भावना कळवल्या होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेला पार्थ छेद देत असतानाही मोठे पवार शांत बसले; पण, सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात पुढे होऊन विरोधी पक्षाप्रमाणे सीबीआय चौकशीची मागणी उचलून धरत पार्थ यांनी सर्व नियम धाब्यावर बसवल्याने पवार प्रचंड नाराज झाले आहेत. यामुळेच त्यांनी पार्थ हे अपरिपक्व असल्याचे उघड भाष्य केले आहे. पवार सहसा सार्वजनिक ठिकाणी व्यक्त होताना संयमी भूमिका घेतात. मात्र, यावेळी त्यांनी पार्थला फैलावर घेताना अजितदादांनाही खरं तर पार्थला दोन बोल सुनावण्याची जबाबदारी तुमची होती, पण मला हे करावे लागले, असे न बोलता सुनावले आहे.

हा सारा प्रकार पाहता पवार घराण्यात सर्व काही आलबेल असल्याचे दिसत नाही. पार्थ राम मंदिरावरून वाद होऊन गप्प बसणार नसेल आणि सुशांत सिंहसारख्या अतिशय संवेदनशील प्रकरणात आघाडी सरकारच्या विरोधात भूमिका घेणार असेल तर याचा अर्थ अजितदादांची त्याला मूक संमती असल्याचे सांगितले जाते. ही संमती म्हणजे दोन महिन्यानंतर ठाकरे सरकार कोसळण्याची नांदी मानली जात आहे. मुख्य म्हणजे याची तयारी दिल्लीत झाली असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून हिरवा कंदील मिळताच ठाकरे सरकार कोसळेल, अशी सूत्रांची माहिती आहे. मागच्या वेळेला रात्रीच्या अंधारात निर्णय होऊन पहाटे शपथविधी करण्याचा धावता खेळ करण्यात आला. यावेळी तसे न करता अगदी ठरल्या संहितेप्रमाणे अजितदादांच्या मदतीने फडणवीस सरकार सत्तेवर येईल.

- Advertisement -

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील, हसन मुश्रीफ आणि जितेंद्र आव्हाड या ज्येष्ठ नेत्यांचा अपवाद वगळता अजित पवार यांच्यामागे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट उभा आहे. विशेष म्हणजे आज धनंजय मुंडे, राजेश टोपे, अनिल देशमुख हे निष्ठावंत समजले जात असले तरी ते सत्तेसाठी अजितदादांबरोबर भाजपच्या वळचणीला कधीही जाऊ शकतात. राष्ट्रवादीतील तरुण आमदारांचा मोठा गट या क्षणाला अजितदादांच्या मागे आहे. ५४ पैकी निम्म्यापेक्षा जास्त आमदार त्यांच्यासोबत असल्याचे दिसते.

सध्या भाजपचे १०५ आमदार असून अपक्षांच्या पाठिंब्याचा विचार करता हा आकडा १२० च्या आसपास जाऊ शकतो. बहुमताला १४५ चा आकडा गाठण्यासाठी २५ आमदारांची गरज आहे. राष्ट्रवादीमधून ही संख्या मिळेल, असे जरी बोलले जात असले तरी प्रसंगी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना गळाला लावण्याची भाजपची तयारी आहे. यासाठी चाचपणी सुरू असल्याचे सांगितले जाते. काँग्रेस आणि शिवसेनेकडून हा आकडा दहाच्या आसपास आल्यास मग फडणवीस यांना सरकार स्थापन करण्यात काही अडचण येणार नाही, असे बोलले जाते.

असे झाले तर…नियमांचा अभ्यास सुरू
अजित पवार यांच्यासोबत येणारा राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट तसेच शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना भाजपमध्ये घेऊन त्यांना पुन्हा निवडून आणायचे असल्यास किंवा दोन तृतीयांशपेक्षा अधिक राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा मोठा गट भाजपमध्ये विलीन होणार असेल तर काय करावे लागेल, याचा जोरदार अभ्यास सध्या भाजपमध्ये सुरू आहे. यासाठी कर्नाटक तसेच मध्य प्रदेशमध्ये काँग्रेसचे सरकार पाडताना केलेला घोडेबाजार तसेच नंतरच्या कायदेशीर बाबी तपासल्या जात आहेत. दोन महिन्यानंतर कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात भाजप सरकार आणायचे, असा अमित शहा यांचा निर्धार पक्का झाला आहे.

आव्हाड पुढे, दादा मागे
ठाकरे सरकारमध्ये सध्या राष्ट्रवादीचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची चलती असून ते म्हणतील ती पूर्व दिशा अशी स्थिती आहे. त्यांच्या महत्वाच्या फायली उद्धव ठाकरे यांच्याकडून तातडीने मंजूर होताना दिसत आहेत. याशिवाय राष्ट्रवादीच्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघात काय चालले आहे, याची माहिती आव्हाड यांना द्यावी लागत आहे. ही माहिती दिल्यानंतर काय करायला हवे? याच्या सूचना आव्हाड देताना दिसत असून शरद पवार यांच्या सुचनेनुसार पक्ष मजबूत करण्याचे हे काम सुरू असल्याचे दाखवण्यात येत आहे. आव्हाड यांच्या बंगल्यावर जाऊन मतदारसंघातील माहिती देणारेच आमदार मग अजितदादांना हे काय चालले आहे, अशी व्यथा मांडताना दिसत आहेत. या नाराज आमदारांना सध्या शांत राहण्याचा सल्ला अजित पवार यांनी दिला आहे. जेव्हा गरज पडेल तेव्हा काय करायचे ते कळवले जाईल, असे सांगितल्याची माहिती आहे.

कुणाच्या कुटुंबात फूट पाडण्याची इच्छा नाही
आम्हाला कुणाच्याही कुटुंबात फूट पाडण्याची इच्छा नाही किंवा सरकार पाडण्याचा प्रयत्नही आम्ही करणार नाही,’ असे भाजपचे आमदार अ‍ॅड. आशिष शेलार यांनी स्पष्ट केले आहे. ‘स्वत:च्या घरातला व पक्षातला विसंवाद लपवण्यासाठी राष्ट्रवादीकडून भाजपचे आमदार फुटणार असल्याच्या अफवा पसरवल्या जात आहेत. पक्षातील अडचणीतून व अपयशातून मार्ग काढण्यासाठी योजनाबद्ध पद्धतीने या बातम्या पसरवल्या जात आहेत. मात्र, त्यांच्या या प्रयत्नांना यश मिळणार नाही,’ असे शेलार म्हणाले.

सरकार ५ वर्षे टिकेल
शिवसेनेचे खासदार संजय राऊत मात्र वारंवार ठाकरे सरकार शाबूत असल्याचा दावा करत असतात. ‘फक्त भाजपचे आमदार टिकवून ठेवण्यासाठी भाजपकडून सरकार पडण्याचे मुहूर्त जाहीर केले जात आहेत. ठाकरे सरकार स्थिर असून सरकारमध्ये कुणाच्याही काही तक्रारी असल्या, तर त्या-त्या वेळी दूर केल्या जातात’, असे संजय राऊत छातीठोकपणे सांगत असतात.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -