भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्याला ७ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मात्र, सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर होणाऱ्या या सामन्याच्या दोन दिवस आधी भारताला मोठा झटका बसला आहे. भारताचा सलामीवीर लोकेश राहुल हाताला झालेल्या दुखापतीमुळे अखेरच्या दोन कसोटी सामन्यांत खेळू शकणार नाही. राहुलला पहिल्या दोन कसोटीत खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु, मयांक अगरवाल सध्या फॉर्मात नसल्याने तिसऱ्या कसोटीसाठी राहुलचा संघात समावेश होण्याची शक्यता होती. मात्र, आता त्याला दुखापतीमुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली आहे.
UPDATE: KL Rahul ruled out of Border-Gavaskar Trophy.
More details 👉 https://t.co/G5KLPDLnrv pic.twitter.com/S5z5G3QC2L
— BCCI (@BCCI) January 5, 2021
‘मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना राहुलच्या डाव्या हाताला दुखापत झाली. त्यामुळे यष्टीरक्षक-फलंदाज राहुल बॉर्डर-गावस्कर करंडकाच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकणार नाही. त्याला दुखापतीतून पूर्णपणे बरा होण्यासाठी तीन आठवड्यांचा वेळ लागणार आहे,’ असे बीसीसीआयने मंगळवारी जाहीर केले. राहुल आता भारतात परतणार असून बंगळुरूच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत (एनसीए) दुखापतीवर उपचार घेईल, असेही बीसीसीआयकडून सांगण्यात आले. राहुलने आतापर्यंत ३६ कसोटी सामन्यांत भारताचे प्रतिनिधित्व केले असून २००६ धावा केल्या आहेत. यात पाच शतके आणि ११ अर्धशतकांचा समावेश आहे.