राज्यातील महाविकास आघाडीमध्ये कोणतेही मतभेद नाही. राज्यात होणाऱ्या महापालिका निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्र लढणार, असं शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सांगितलं. एकत्र निवडणूक लढलो तर पदवीधर निवडणुकीप्रमाणे महापालिकांचे निकाल लागतील. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद जास्त आहे, तिथे त्या पक्षाकडे नेतृत्व सोपवू, असं संजय राऊत म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतीही खेचाखेची नसल्याचं देखील संजय राऊत यांनी दाखवलं. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी ही माहिती दिली.
जमेल तिथे आणि शक्य असेल तिथे आम्ही एकत्र निवडणुका लढवू. एकत्र निवडणुका लढल्यानं काय निकाल लागतात हे शिक्षक आणि पदवीध निवडणुकांमध्ये पाहिलं. त्यामुळे अशाच प्रकारचे निकाल महाराष्ट्रातील सर्व महानगर पालिका आणि जिल्हा परिषदांमध्ये लागावे असं तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची भूमिका आहे आणि मानसिकता आहे. आमच्यामध्ये कोणतीही खेचाखेची नाही. महाराष्ट्रीतील सत्ता पाच वर्षांसाठी राहिल, असं संजय राऊत म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्ही एकत्र निवडणूक लढू. सत्तेचं वाटप केलं जाईल. ज्या भागात ज्या पक्षाची ताकद मोठ्या प्रमाणात आहे, तिथे त्यांना नेतृत्व द्यावं, असं ठरलं आहे, असं संजय राऊत यांनी सांगितलं. पिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादीची ताकद जास्त आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी सोबत चर्चा करेल. याशिवाय, पुण्यात दोन जागांसाठी होणाऱ्या पोटनिवडणुकीत एक जागेवर राष्ट्रवादी लढेल तर दुसऱ्या जागेवर शिवसेना लढेल, असं संजय राऊत यांनी सांगितलं.