काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील आणि काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा निवासस्थानी जाऊन भेट घेतली. यावेळी ज्या समान किमान कार्यक्रमावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं त्या समान किमान कार्यक्रमावर सरकार चाललं पाहिजे, असं काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. तसंच, काँग्रेसकडे असलेल्या खात्यांना निधी कमी मिळत असल्याची तक्रार देखील मुख्यमंत्र्यांकडे केली.
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटले. यावेळी काँग्रेस नेत्यांकडे असलेल्या खात्यांना कमी निधी मिळत असल्याची तक्रार केली. तसंच समान किमान कार्यक्रमाची आठवण देखील करुन दिली. यावर समन्वय समिती शिवाय वरिष्ठांची समिती होईल, जी समान किमान कार्यक्रमावर चर्चा करेल, असं एच. के. पाटील म्हणाले.
काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर माध्यमांशी बोलताना शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या यूपीएच्या वक्तव्यावर देखील भाष्य केलं. सानिया गांधी यांच्या यूपीए अध्यक्ष पदाबद्दल संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर नेते नाराज आहेत. संजय राऊत यांच्याबद्दल अनेक तक्रारी आल्या आहेत, असं एच. के. पाटील म्हणाले.
निधी वाटप, महामंडळ वाटपाविषयी चर्चा झाली. तसंच समान किमान कार्यक्रमानुसार सरकार चालवण्याविषयी चर्चा केली. मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर महसुल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी लकडाऊन नको हीच सरकारमधील सर्वांची भावना आहे, असं म्हटलं.