दुबईमध्ये सुरु असलेल्या आशिया कप स्पर्धेमध्ये शुक्रवारी भारत आणि बांगलादेशमध्ये चुरशीचा सामना रंगला होता. सामन्याअंती भारताने ७ गडी राखत बांग्लादेशचा धुव्वा उडवला. बांगलादेशला हरवल्यामुळे भारतीय टीमला आशिया कपमधील सलग तिसरा विजय मिळाला आहे. शुक्रवारच्या सामन्यामध्ये रोहित शर्माची दमदार खेळी विशेष लक्षवेधी ठरली. रोहितने हाफ सेंच्युरी पूर्ण करत १०४ बॉल्समध्ये ८३ रन्स काढल्या. ज्यामध्ये ५ चौकार आणि ३ षट्कारांचा समावेश आहे. सामन्यामध्ये पहिल्यांदा फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशच्या फलंदाजांचा जडेजाच्या फिरकी गोलंदाजीपुढे गोंंधळ उडाला. प्रथम फलंदाजी करणाऱ्या बांगलादेशने ४९.१ ओव्हर्समध्ये एकूण १७३ (ऑलआऊट) रन्स केल्या. ज्यामध्ये जडेजाने ४ विकेट्स तर बुमराह आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. बांगलादेशचा खेळाडू मेहंदी हसन याच्या सर्वाधिक ४२ रन्समुळे केवळ बांगलादेशचा संघ १७३ रन्स बनवू शकला.
Another day, another match, another dominating performance. #TeamIndia seal the game against Bangladesh by 7 wickets #AsiaCup2018 #INDvBAN pic.twitter.com/Fntb9xt05X
— BCCI (@BCCI) September 21, 2018
दुसरीकडे भारतीय संघाच्या फलंदाजी दरम्यान शिखर धवनने ४०, महेंद्रसिंघ धोनीने ३३ तर अंबाती रायडुने १३ रन्सची खेळी केली. ३७ बॉल्समध्ये ३३ रन्स बनवणारा धोनी विजयी चौकार मारण्याच्या नादात बाद झाला. या सामन्यात भारतीय संघात एकमेव बदल करण्यात आला आहे. हार्दिकच्या जागी रवींद्र जडेजाला संधी मिळाली आहे. जडेजा एक वर्षानंतर संघात पुनरागमन केले आहे. दुसरीकडे बांगलादेशच्या संघात दोन बदल करण्यात आले होते. मोमिनुल हक आणि अबू हैदर यांना संघाबाहेर ठेवण्यात आले.