भारत-इंग्लंड चौथ्या कसोटीत भारतीय संघाने धावांची आघाडी करुन सामन्यावर चांगली पकड केली होती. चौथ्या दिवशी इग्लंडसमोर आव्हान उभं करण्याचे लक्ष टीम इंडियाचे होते मात्र त्यापुर्वीच संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्यासह ४ प्रशिक्षकांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिल्यामुळे टीम इंडियाला मोठा धक्का बसला आहे. भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला, यामुळे बीसीसीआय वैद्यकीय पथकाने गोलंदाज प्रशिक्षक भरत अरुण, क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर आणि फिजिओथेरेपिस्ट नितीन पटेल या चारही प्रशिक्षकांना विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. या प्रशिक्षकांना सध्या भारतीय संघाच्या हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं आहे मात्र त्यांना संघासोबत प्रवास करता येणार नाही.
मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांची शनिवारी कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अन्य ३ प्रशिक्षकांनाही विलगीकरणात राहण्याचा सल्ला दिला आहे. या प्रशिक्षकांच्या पुन्हा कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. प्रशिक्षकांच्या संपर्कात खेळाडू आल्यामुळे आता खेळाडूंना कोणताही धोका नाही ना? याची पडताळणी करण्यात येणार आहे. कसोटीदरम्यान संघाचे प्रशिक्षकच कोरोना पॉझिटिव्ह झाल्यामुळे भारतीय संघाला मोठा धक्का बसल्याचे मानलं जात आहे.
UPDATE – Four members of Team India Support Staff to remain in isolation.
More details here – https://t.co/HDUWL0GrNV #ENGvIND pic.twitter.com/HG77OYRAp2
— BCCI (@BCCI) September 5, 2021
बीसीसीआयने आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन प्रशिक्षकांना कोरोना झाल्याची माहिती देण्यात आली आहे. चारही प्रशिक्षक जोपर्यंत संघात परतत नाहीत तोपर्यंत टीम इंडिया आणि बीसीसीआयमध्ये चिंतेचे वातावरण कायम राहण्याची शक्यता आहे. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह आल्याशिवाय या प्रशिक्षकांना पुन्हा संघात परतता येणार नाही यामुळे पाचवी कसोटीसुद्धा प्रशिक्षकांशिवाय जाण्याची शक्यता असल्याचे दिसत आहे. कोच संघाबाहेर असल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला असून या अडचणींवर खेळाडू कसे मात करतील हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.