राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी आज आज ट्वीटरच्या माध्यमातून एनसीबीच्या अधिकार्याने नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर दिलेले एक पत्र शेअर करुन पुन्हा एकदा खळबळ उडवून दिली आहे. यात एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. यावर एनसीबीचे उपमहासंचालक मुथा अशोक जैन यांनी हे पत्र मिळाल्याचं सांगत याची चौकशी करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेत अनेक गौप्यस्फोट केले. तसंच, एका अज्ञात एनसीबी अधिकाऱ्याकडून मिळालेलं पत्र ट्विटर पोस्ट केलं आहे. या चार पानांच्या पत्रात समीर वानखेडे यांच्यावर अनेक गंभीर आरोप आहेत. या पत्रात २६ वेगवेगळ्या प्रकरणांची माहिती आहे. ज्या प्रकरणांमध्ये लोकांना मुद्दाम अडकवण्यात आलं आहे अथवा फसवण्यात आलं आहे याबाबतची माहिती त्या आधिकाऱ्यांनी दिली आहे.
त्या अज्ञात अधिकाऱ्याने राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, काँग्रेसच्या अंरिम अध्यक्षा सोनिया गांधी, काँग्रेसचे खासदार नेते राहुल गांधी यांना पत्र पाठवलं आहे. याची चौकशी करण्याची मागणी आम्ही करणार आहोत. तपासांमध्ये या पत्रातील २६ प्रकरणांचा समावेश करावा, ही विंनती करणार आहे, असं नवाब मलिक म्हणाले. समीर वानखेडे यांच्याकडून वसूली झाली आहे. मालदीव आणि मुंबईमध्ये वसूली झाली आहे. माझ्या अंदाजानुसार एक हजार कोटींपेक्षा जास्त वसूली झाली असून एनसीबीच्या तपासात सर्व सत्य समोर येईल, असं नवाब मलिक यांनी सांगितलं.