नंदुरबार : नाशिक जिल्ह्यातील खरडशेत येथील आदिवासी महिलांची पाण्यासाठी जीवघेणी पायपीटबाबतचे भीषण वास्तव समोर आल्यानंतर पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी तातडीने याची दखल घेत गावात पूल बांधून दिला. तसेच, तीन महिन्यांत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. याच धर्तीवर आता आदिवासी भागातील महिलांची पाण्यासाठी वणवण थांबावी याकरिता जिल्हा विकास व संनियंत्रण समितीच्या बैठकीत ‘हर घर नल, हर घर जल’ योजनेंतर्गत १६५८ कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला.
खासदार हिना गावित यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत जिल्हाधिकारी मनीषा खत्री, आमदार डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, अशासकीय सदस्य डॉ. कांतीलाल टाटीया, डॉ. स्वप्निल बैसाणे आदी उपस्थित होते.
‘हर घर नल, हर घर जल’ योजनेंतर्गत जिल्ह्यातील ५७५ ग्रामपंचायतींसाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. योजना राबवताना कामे दर्जेदार करावीत. जलजीवन मिशन अंतर्गत कामे झालेल्या गावांची माहिती उपलब्ध करून घ्यावीत, असेही त्यांनी सांगितले. अशुद्ध पाण्यामुळे अनेक आजार होत असल्याने ज्या ठिकाणी पाणीपुरवठा योजना सुरू आहे अशा ठिकाणी भूजल सर्वेक्षण विभागाने बोअरवेल, विहिरीचे पाणी पिण्यायोग्य आहे का याची पडताळणी स्वच्छ भारत मिशन अंतर्गत वैयक्तिक शौचालय व गटारीची कामे पूर्ण करण्यावर बैठकीत चर्चा करण्यात आली.
बैठकीत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना, प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रस्ते, सिंचन तसेच केंद्र शासनाच्या विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. बैठकीस दिशा समितीचे अशासकीय सदस्य आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.