जनाब संजय राऊत तुम्हाला उत्तरप्रदेश आणि गोवा येथील निवडणूकीत नोटा पेक्षाही कमी मत मिळाले आणि आदित्य ठाकरे यांना देशपातळीवर लाँच करून त्यांचा पार फज्जा उडविला. कदाचित ज्या पद्धतीने काकांनी राहुल गांधींना टोपन नाव मिळवून दिले. तशीच काही तुमची सुप्त इच्छा आदित्य ठाकरेंबाबत दिसत असल्याचे पडळकर म्हणाले होते. त्यावर पलटवार करताना शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले की, ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संचालक मोहन भागवत यांची मुस्लिमसंबंधित काही दिवसांपासूनची वक्तव्य पाहिली तर आरएसएसला सुद्धा जनाब म्हणणार का?’
आजपासून शिवसेनेच्या शिवसंपर्क अभियानाला सुरुवात होत आहे. त्यानिमित्ताने आज संजय राऊत नागपूर दौऱ्यावर आहेत. नागपूरमधील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांना गोपिचंद पडळकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रश्न विचारला तेव्हा ते म्हणाले की, ‘कोणाविषयी बोलायचं हे आमचं ठरलेलं आहे. भाजपकडून सातत्याने शिवसेनेला जनाब असं म्हटलं जातंय. तर हा काय आहे जनाब? या देशात २२ कोटी मुस्लिम राहतात. त्यातले हजारो मुस्लिम हे भाजप, आम्हाला मतदान करत असतील. ज्या नागपूरमध्ये आज आपण बसलो आहोत, त्या नागपूरमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय आहे. एक हिंदुत्वाची विचारधारा घेऊन जाणारी देशात एक प्रमुख संघटना आहे. आम्ही त्यांच्याकडे अनेकदा आदराने पाहतो. त्या संघटनेचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांची गेल्या काही काळातील मुस्लिम समाजाविषयी वक्तव्य पाहिली तर तुम्ही संघालाही जनाब सेना म्हणणार का? मोहनराव भागवत यांनी मुस्लिम आणि हिंदुंचा टीएनए सारखा आहे, असे अनेकदा सांगितले आहे. म्हणून ते जनाब सेनेचे प्रमुख झाले का?’
भाजपला मिया, खान, मौलाना म्हणायचं का?
‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मुस्लिमांसाठी राष्ट्रीय मंचाची स्थापना केली. या देशातील नेते, राजकारणी किंवा इतर कोणी या देशात मुस्लिमांनांनी राहू नये, अशी भूमिका मांडत असतील. तर ते हिंदू नाहीत, त्यांना हिंदू म्हणता येणार नाही, असं म्हणणाऱ्या मोहनराव भागवतांना जनाब संघ अशी उपमा देणार? तसेच बीजेपी पीजेपी म्हणजे पाकिस्तान जनता पार्टी असं म्हणणार? मुस्लिम या देशाचा भाग आहे. लाखो मुस्लिम या देशात राहतात. भाजपने नेमलेले राज्यपाल अनेक मुस्लिम आहेत. केरळचे राज्यपाल मुस्लिम आहे. सिकंदर बख्त सारखे भाजपचे नेते होऊन गेलेत. आमच्याकडे आहेत. या देशामध्ये फक्त जातीय, धार्मिक द्वेष निर्माण करून कोणी राजकारण करू इच्छित असेल तर जिन्नांनी एक फाळणी केली. तुम्ही रोज फाळणी करताय आणि केव्हातरी याची किंमत त्या देशाला चुकवावी लागेल. जर तुम्हाला आम्हाला जनाब सेना म्हणायचं आहे, तर भाजपचे अल्पसंख्याक विभाग कशा करता केलाय? कोणासाठी निर्माण केलाय? आम्ही तुम्हाला मिया, खान, मौलाना म्हणायचं का? पण आम्ही म्हणणार नाही,’ असे संजय राऊत म्हणाले.
हेही वाचा – माझ्यासारखे कुठल्याही सुरक्षेविना महाराष्ट्रात फिरुन दाखवा, पडळकरांचे संजय राऊतांना थेट आव्हान