त्रिपुराचे मुख्यमंत्री असलेल्या बिप्लब देब पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. त्यासाठी कारणीभूत ठरलं आहे ते १ मे बद्दल केलेलं विधान. १ मे अर्थात आंतरराष्ट्रीय कामगार दिनी दिल्या जाणाऱ्या सुट्टीची सरकारी कर्मचाऱ्यांना गरज काय? असा सवाल त्यांनी केला आहे. परिणामी बिप्लब देब यांनी पुन्हा एकदा लोकांची नाराजी ओढून घेतली आहे. राजधानी आगारताळा येथे राजपत्रित अधिकाऱ्यांच्या संघटनेनं आोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. सरकारी कर्मचाऱ्यांना आंतरराष्ट्रीय कामगार दिनाच्या सुट्टीची गरज नाही. सरकारी कर्मचारी काही श्रमिक नाहीत. आयपीएफटी म्हणजेच भाजपा-स्वदेशी पीपुल्स फ्रन्ट सरकारनं कामगार दिवस हा सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्यांमधून वगळला देखील आहे.
यावेळी बोलताना बिप्लब देब यांनी अनेक सवाल केले. तुम्ही कामगार आहात का? तर नाही. मी सुद्धा कामगार नाही. मी मुख्यमंत्री आहे. आपण मंत्रालयामध्ये जनतेसाठी काम करतो. आपण उद्योग क्षेत्रात काम करत नाहीत. मग. आपल्याला सुट्टीची काय गरज? असा सवाल बिप्लब देब यांनी केला.
कामगार दिन म्हणजे काय? असे म्हणत त्यांनी यावेळी कामगार दिनाबद्दल माहिती द्यायला सुरूवात केली. देशात काही मोजकी राज्यं आहेत जी १ मे रोजी सुट्टी देतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये काम करणाऱ्यांसाठी १ मे रोजी सुट्टी देण्यात आली आहे.