भारतात लवकरच येत्या काही वर्षांत हायड्रोजन इंधनावर चालणारी गाड्या धावताना दिसणार आहेत. तसेच पुढील दीड ते दोन वर्षांत भारतातील नागरिकांना हायड्रोजन कार वापरता येणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. एका आयोजित अवॉर्ड्स शोमध्ये नितीन गडकरी बोलत होते.
वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यावरही नितीन गडकरींनी भाष्य केलं आहे. भारतात हायड्रोजन कारमध्ये वापरण्यासाठी बायो इंधन तयार केले जात आहे. यासाठी कचऱ्याचा वापर होतोय. परंतु आपल्याला इंधन आयात करण्याची गरज नाही. भविष्यात भारत बायो इंधन निर्यात करेल, असंही गडकरी म्हणाले.
आता लवकरच बायो इंधनावर गाड्या चालतील. येत्या दीड ते दोन वर्षांत भारतातील लोकं हायड्रोजन कार चालवू शकतील. प्रतिकिलो हायड्रोजन ८० रूपयांत मिळावा यासाठी माझा प्रयत्न आहे. १ किलो हायड्रोजनमध्ये ४०० किमी धावू शकते, असंही गडकरी म्हणाले.
सध्या हायड्रोजन तीन प्रकारे बनवले जात आहे. काळा हायड्रोजन, तपकिरी हायड्रोजन आणि ग्रीन हायड्रोजन असं आहे. हायड्रोजन कचरा, सांडपाणी आणि पाण्यापासून बनवता येतो. परंतु भारतात बायो इंधनावर गाड्या आणल्यानंतर वाहनांच्या प्रदूषणापासून नागरिक मुक्त होतील असं चित्र दिसतंय.