नवी दिल्ली – काँग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी आज (२४ मार्च) रद्द करण्यात आली आहे. राहुल गांधी हे केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. त्यांचे लोकसभा सदस्यत्व आज लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी रद्द केले, तसे आदेश लोकसभा सचिवालयाने आजच जारी केले आहेत. त्याचवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे त्यांचा लोकसभा मतदारसंघ वाराणसीमध्ये होते. पंतप्रधान मोदींनी भारताला क्षयमुक्त करण्याची घोषणा केली आहे. टीबी-मुक्त पंचायत कार्यक्रमात ते सहभागी झाले. यावेळी पंतप्रधानांनी टीबीवरील भारताचा २०२३चा वार्षिक अहवालही सादर केला.
वाराणसी दौऱ्यावर असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राहुल गांधींबद्दल किंवा त्यांच्या खासदारकीबद्दल अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. वन वर्ल्ड टीबी समिटल संबोधित कताना पंतप्रधान म्हणाले, गेल्या नऊ वर्षांमध्ये भारताने एकजुटीने क्षयरोगाविरोधात लढाई लढली आहे. या युद्धात लोक मोठ्या धैर्याने आणि हिंमतीने सहभागी झाले आहेत. यावेळी पंतप्रधानांनी वाराणसीसाठीच्या १७८५ कोटी रुपयांच्या विकास कामांचेही लोकार्पण केले. अर्बन ट्रांसपोर्ट रोपवेचे भूमीपूजन मोदींच्या हस्ते करण्यात आले.
Yes, we can end TB. pic.twitter.com/hphOEUSSvN
— Narendra Modi (@narendramodi) March 24, 2023
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘ही आनंदची गोष्ट आहे की हा कार्यक्रम वाराणसीमध्ये होत आहे. काही दिवसांपूर्वी वन अर्थ, वन हेल्थ मिशनची सुरुवात करण्यात आली आहे. आता वन वर्ल्ड टीबी समिटच्या माध्यामातून भारत जगाच्या कल्याणाचा संकल्प पूर्ण करत आहे.’ यावेळी मोदींच्या हस्ते क्षय रोग मुक्तीसाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेश आणि जिल्ह्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान मोदींनी यावेळी संकल्प केला आहे की २०२५ पर्यंत भाराताला क्षयमुक्त करणार.